मंगळवार, ३१ मे, २०११

------------------------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल----७

एंपरर ऑफ ऑल मॅलडीज
लेखक: सिद्धार्थ मुखर्जी
स्क्रिबनर प्रकाशन, (नोव्हेंबर २०१०),
पृ.५५०, किंमत: र ४९९/२९९(फ्लिपकार्ट)

सर्व रोगांचा बादशहा : कर्क-रोग
ह्याच महिन्यात ह्या पुस्तकाला कोलंबिया विद्यापीठाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय एका भारतीय डॉक्टराने लिहिलेले, अशा दुहेरी आकर्षणामुळे, हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे झाले आहे.
कर्क-रोग आताशा कमी भयकारी वाटत असला तरी त्याच्या नुसत्या कल्पनेने अजूनही आपला थरकांप होतोच. आपण आजूबाजूला प्रत्यही अनेक माणसे ह्याने बाधित होऊन लढताना पाहतो. त्यांचे वेडेवाकडे झालेले चेहरे, डोक्याला बांधलेले फडके, त्यांचे वारंवारचे केमोथेरपी प्रकरण, रेडियेशन थेरपीचे छळ, होणार्‍या भयंकर वेदना, उलटया, व एकंदरीतच त्रस्त करण्याने, हा रोग आपल्याला तर नाहीच पण जगातल्या कोणालाच होऊ नये, असे पसायदान मागवणारा हा रोग, सर्व रोगांचा बादशहा कसा आहे ह्या कल्पनेने लिहिलेले हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात कर्करोगाचे जणु चरित्रच रेखाटलेले आहे. आणि ही माहीती अगदी तांत्रिक असली तरी, थोडयाशा चिकाटीने, सामान्यांना समजेल अशा इंग्रजीत वाचताना एखादे ललित वाङमयच वाचतो आहोत असा भास होतो.
गेली शंभर वर्षे अत्यंत हुशार डॉक्टरांना व शास्त्रज्ञानांना चकमा देणारा हा रोग आहे. आज जरी बहुतेक सर्व कर्करोगांवर औषधोपचार उपलब्द असले तरी हा समूळ नष्ट करणे किंवा होऊच नये अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अजूनही दुरापास्तच. त्यामुळे अशा हटटी रोगावरचे एक पुस्तक वाचून सगळे ज्ञान होईल हे जरी संभवनीय नसले तरी असे प्रयत्न आजतागायत कसे झाले व त्याला कसे यशापयश येत गेले, आणि हा रोग कसा चोर पावलांनी शरीर काबीज करतो हे खुद्द एका डॉक्टराने, अतिशय सजग भावनेने लिहिलेले आहे. ह्यात रोग्यांच्या कळवळ्यापेक्षा ह्या रोगाचे वागणे, पसरणे, त्यावरचे उपाय, वगैरे तांत्रिक बाबी एक प्रकारच्या उत्तरदायीत्वाच्या भावनेने लेखकाने ठळक केल्या आहेत. त्यात संशोधकाच्या माहीतीचे अवडंबर माजवण्यापेक्षा मूलभूत विचार कसा करावयाचा ह्याचे लेखक प्रत्यंतर आणतो.
ह्या रोगावर अथक परिश्रम करून मेहनतीने व हुशारीने औषधे शोधून काढणार्‍या डॉक्टरांच्या गाथा ( कधी यशाच्या तर कधी अपयशाच्या ) वाचताना जसे नोबेल प्राइज मिळवणार्‍या फार्बर ह्यांची माहीती वाचताना रोमांचित व्हायला होते, तसेच १९२० साली अमेरिकेत गेलेल्या श्री.येल्ला सुब्बाराव ह्या डॉक्टराने रक्तक्षयावरचे फॉलिक ऍसिडवाले औषध कसे शोधले हे वाचताना ( पृ.४१), आपल्याला भारतीय असण्याची धन्यता वाटते.
ह्या रोगाने माणसाला व डॉक्टरांना कसे चकवले हे वाचताना वाचकांचा धीरच सुटावा अशी पाळी येते व त्यावर लेखक फार मूलभूत असे जे हिपोक्रॅटसचे भाष्य आहे त्याची आपल्याला ओळख करून देतो. औषधोपचारावर हिपोक्रॅटस ( पृ. ३५२) म्हणतो, "आर्स लॉंगा, व्हिटा ब्रेव्हिस" ( औषधोपचाराची कला लंबीचौडी, वेळखाऊ आहे, व जीवन छोटे आहे; संधी सारखी निसटती असते; प्रयोग फसतात; व निर्णय चुकतात. ). तसेच ऑंकॉलॉजी ह्या नावाचा उलगडाही मोठा मनोज्ञ वाटतो. ऑंकस ह्या ग्रीक मूळ शब्दाचा अर्थ होतो, एक ओझे, बोजा, जे कर्करोग झालेल्याला कायमच वागवावे लागते. ह्या तांत्रिक मूलभूत माहीतीमुळे हा बोझा थोडा पेलवल्यासारखा तरी भासतो.
सिगरेट मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो हे आता आपल्याला चांगलेच पटलेले आहे. पण अमेरिकेत ह्यावर तेव्हा कसे जंग छेडावे लागले व त्यावर कसे उपचार शोधले गेले, ह्याची मनोरंजक माहीती ( २८३-३१८) ह्या प्रकरणात वाचून थक्क व्हायला होते. हे वाचताना परळच्या टाटा कर्करोग इस्पितळात त्यांनी जे फलक लावले आहेत, (गुटखा सेवनाने घशाचा कर्करोग कसा होतो त्यासंबंधी), त्याचे स्मरण होते. गुटखा खाणे, तयार करणे ह्यावर अशीच चळवळ करून बंदी आणायला पाहिजे, हे तीव्रतेने जाणवते. सिगरेट उत्पादकांची बाजू जशी तत्कालीन सरकारे घेत, त्याच प्रमाणे सध्याचे आपले सरकार किती बेफिकीरीने गुटखा उत्पादकांची बाजू घेते आहे हे पाहिल्यावर माणसांच्या नशीबी ही दुर्दशा का येते ह्याचे वैषम्य वाटते.
गुंतागुंतीची माहीती अगदी सुगम करण्यात ह्या तरुण लेखकाला चांगलीच हातोटी लाभलेली दिसते. निरनिराळ्या विषारी रसायनांचे मिश्रण ( कॉकटेल) करून करायच्या केमोथेरपीचे विवेचन करताना, ओव्हर-डायग्नोसिस व अंडर-डायग्नोसिसचे संतुलन कसे सांभाळावे लागते हे विशद करताना लेखक ( पृ.३२९-३४८) कोळ्याच्या जाळ्याची उपमा देतो. कोळ्याने जाळे जर फारच बारीक ( दाट ) विणले तर माशीच काय लहान चिलटे, कचरा, धूळही जाळ्यात अडकेल व जाळे फारच दूरदूर ( विरळ ) विणले तर माशाही सटकून जातील. असेच योग्य प्रमाणात औषधांचा डोस डॉक्टरला प्रत्येक पेशंटच्या केसप्रमाणे योजावा लागतो. व म्हणूनच हे प्रकरण खूपच अवघड होते.
प्रतिबंधक उपाय योजना, लसी, कमी साईड-इफेक्टची औषधे, संशोधन, रोग्यांचा पाठपुरावा, अशा कितीतरी तरकीबी अजूनही कर्क-रोगाशी लढताना करायच्या बाकी आहेत हे कबूल, पण ह्या शत्रूशी लढताना आता हा कसा ओळखीचा वाटतो व त्याच्या सगळ्या लहरी, गनीमी लढाया, आता आपल्याला अवगत झालेल्या आहेत असेच हे पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागते व ही मोठीच उपलब्धी आहे हे नि:संशय !

------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव *( सोबत चित्र मुखपृष्ठाचे )
arunbhalerao67@gmail.com

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, ११ मे, २०११

वाचाल तर वाचाल----८
"परत मायभूमीकडे"
लेखक: डॉ.संग्राम पाटील
समकालीन प्रकाशन (मार्च,२०११), पृ.१०७, किं:१२५र
एक वेगळा प्रवास
आजकाल वेगळेपण दिसणं हे फार कष्टाचं झालं आहे. जिकडे पाहावे तिकडे "जनांचे प्रवाहो" घोळक्याने व एकाच दिशेने घोंघावत चाललेले दिसतात. त्यात कोणाचे वेगळेपण टिपणे, थोडे थांबून त्यांचे कौतुक करणे हे फार अगत्याचे असते, हेही आपण ह्या धुमश्चक्रीत विसरतो. इंजिनियर, डॉक्टर मंडळींनी परदेशी जाणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यात त्यांचे परत येणेही ( प्रमाणाने कमी असले तरी ) निरनिराळ्या कारणाने नजरेत भरते. बर्‍याच जणांच्या परत येण्यामागच्या खंता न लपता स्पष्ट दिसून येतात, तर ह्या पुस्तकातल्या तरुण डॉक्टर दांपत्याचे असेच परत येणे, आवर्जून खेडे गावात प्रॅक्टीस सुरू करणे, थोडे आपल्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेचे भान दाखवणे हे खासे वेगळे तर आहेच, पण बरेच सुखावणारेही आहे. ह्या बद्दल ह्या दांपत्याचे व समकालीन प्रकाशनाचे कौतुक करायलाच हवे. हे पुस्तक वाचायलाच हवे.
खेडेगावातून, गरीबीतून एक मुलगा, संग्राम पाटील, शिक्षणाची कास धरतो, मेहनत करतो, डॉक्टर होतो, नूपूर ह्या डॉक्टर जोडीदारीणीबरोबर पुढील शिक्षणासाठी अनुभवासाठी व जरा कर्ज फेडण्यासाठी चार पैसे मिळविण्यासाठी ब्रिटनला जातो व मायदेशाच्या ओढीने दोघेही परत येऊन एरंडोल येथे एक सुसज्ज हॉस्पिटल व शाळा सुरू करतात अशा ह्या वेगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे. ती मनोरंजक तर आहेच पण ह्या डॉक्टर दांपत्याचे सत्चरित्र दाखवते व वाचकाला त्यांच्या मोहात पाडते. त्यांच्या ह्या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाला आपण अभिष्ट-चिंतन द्यायलाच हवे, कारण त्याने नवीन समाजाचे चित्र निश्चितच सुखकर होणारे आहे.
अगदी अडचणीत राहून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व नोकरी करताना डॉक्टर संग्राम पाटील एक आदर्श राहणीमानाची आपल्याला जाणीव करून देतात. त्यापैकी मुतारीचे पैसे वाचविण्यासाठी ते थंडीत लघवी रोकून ठेवतात, टपालपेटीची वेळ साधण्यासाठी एवढ्या थंडीत मैल दोन मैल पळत जातात वगैरे मनोनिग्रहाचे नमूने वाचकांना आदर्श साधकाचे पाठच देऊन जातात. डॉक्टर अभय बंग ह्यांच्या प्रभावाखाली हे डॉक्टर दांपत्य सेवाव्रताची जाणीव बाणतात, हेही वाचताना अजूनही चांगल्या लोकांचा बराच प्रभाव समाजात पडू शकतो हा दिलासा मिळतो. तसेच हे डॉक्टर दांपत्य समाजातल्या, डॉक्टरी व्यवसायातल्या अनिष्ट प्रथांना बळी पडत नाही हे वाचून चांगुलपणावरचा विश्वास हमखास वाढतो व आजकालच्या वातावरणात ह्याची अत्यंत गरज भासते.
पण पुस्तकाच्या मांडणीत जरा गफलत झाल्यासारखे वाटते. पुस्तकाचा रोख शीर्षकाप्रमाणे ( परत मायभूमीकडे ) मायभूमीतल्या कामावर असावयास हवा होता. पण पारंपारिक आत्मचरित्राच्या थाटात तो इंग्लंडमधल्या आरोग्यव्यवस्था, तिथला समाज, त्यांचे आचार-विचार, तिथले भ्रष्टाचार-मुक्त व्यवहार, ह्याचेच चित्रण करण्यात जातो. त्याने लेखकाला अजूनही तीच ओढ खुणावतेय की काय असा संशय चाटून जातो. पुस्तकाच्या आवाक्यात एकच शेवटचे ( ते ही छोटे-खानी ) प्रकरण मायभूमीतल्या प्रयत्नांसंबंधी असावे हे खटकते अशासाठी की पुस्तकाचा मुख्य रोख ( फोकस ) त्यामुळे बदलतो. इंग्लंडमधल्या अनुभवात लोकांना वेगळेपण दिसणे तितके लोभावत नाही, जितके ते मायभूमीच्या मनसुब्यांवर ठासून वेगळे दिसले असते. तसेच डॉक्टर दांपत्य आता एरंडोल येथे जो दवाखाना चालवताहेत त्यात किती फीस घेतात, मोफत इलाज किती जणांना देतात, तसेच सामाजिक उत्तर-दायित्वाच्या कल्पनेने मलेरियावर काय सार्वजनिक उपाययोजना आखतात, हे विस्ताराने वाचायला वाचकाल आवडले असते. शिवाय त्याने इतर डॉक्टरांनाही मोलाचे दिशादर्शन झाले असते. खैर, ह्या तरुण डॉक्टर दांपत्याचा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला असल्याने ते लवकरच वेगळ्या प्रवासातले मैलाचे दगड आपल्या नजरेत आणून देतील अशी आशा करू या व त्यांना शुभेच्छा देऊया.


----------------------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव * सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र
arunbhalerao67@gmail.com