गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२




"वार्‍याने हलते रान "*
अकादमीचा ग्रेसफुल सन्मान !
    प्रसिद्ध कवी ग्रेस ( उर्फ माणिक गोडघाटे ) ह्यांच्या "वार्‍याने हलते रान" ह्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पुस्तक ललित निबंधांचे असले तरी हा पुरस्कार एका कवीलाच/काव्यालाच आहे. कवितेचे विश्व केवळ तुटक तुटक ओळींनी छापलेले साहित्य, एवढयाच बाह्य रूपापुरते मर्यादित असत नाही तर कवितेची निर्मिती कशी होते, कवीला आपल्याच कवितांबद्दल काय वाटते हे सुद्धा काव्याचे एक महत्वाचे अंग आहे. किंवा हे काव्याच्या मुळांवरचे गद्य आहे असे म्हणता येईल. हे पुस्तक गद्यात, ललित निबंधाने अवतरले तरी ते काव्याच्याच विश्वासंबंधी आहे. त्यामुळे प्रथम जरा आश्चर्याचे वाटले तरी एका कवीला त्याच्या गद्य लिखाणासाठी पुरस्कार मिळावा ह्यात साहित्य अकादमीच्या खुल्या मनाची प्रचीती येते व त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
    चित्रकाराला "तुम्हाला चित्रे कशी सुचतात", किंवा कवीला "तुम्हाला कविता कशा सुचतात" असे विचारण्याची आपली एक साहजिकच परंपरा आहे. हे आपल्याला कलेच्या निर्मितीच्या कुतुहूलापोटी वाटत असते व ते आपण प्रत्यही कलाकाराला विचारत असतो. ह्या कुतुहूलाचे निराकरण वेळ प्रसंगी अनेकांनी आपल्या मगदूराप्रमाणे केलेले आहे. जसे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की, "आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥". हे सांगणे थोडे देवभोळेपणाचे आपणास वाटत असेल, तर नुकतेच "महाराष्ट्र-काव्यभूषण" किताब मिळालेले कवी मंगेश पाडगावकर निर्मितीचे रहस्य उलगडताना सांगतात की, एखादी ओळ अचानकच सुचते व मग ती अनेक दिवस रुंजी घालते व मग त्या विषयानुरूप ते त्याची कविता करतात. आता हा रहस्यभेद सुलभ भाषेत सांगितलेला असला तरी निर्मितीची नेमकी प्रक्रिया आपल्याला कळतच नाही. हलणार्‍या राना कडे पाहताना ह्या रानाला हलवणारा जो वारा आहे ( निर्मिती ), त्या वार्‍याला पकडता येईल का , म्हणजे कार्यकारण भावाने  निर्मितीचे आदी अंत पकडता येतील का ह्या प्रयत्नातून प्रस्तुत पुस्तक कवी ग्रेस लिहीत आहेत, असे ते आरंभीच सहीशिक्क्यानिशी घोषित करीत आहेत.
    कवीने कवितेतून एखादा विचार मांडला तर त्याला एरव्ही गद्य निबंधांत जे विचारांचे, तर्कसंगतीचे नियम लागू होतात, ते लागू करता येत नाहीत. कारण त्याची कविता ही एक भावभावनांचे अविष्करण असते, ते काही एखादा तार्किक विषय मांडणे नसते. "सौंदर्यमीमांसा" ह्या सौंदर्यशास्त्रावरच्या गंभीर अभ्यासात श्री.रा.भा.पाटणकर ( पृ.३५१) म्हणतात की ऍरिस्टॉटलने सांगितल्याप्रमाणे, "अनुकृती व ती जिची अनुकृती आहे ती गोष्ट यांच्यात निश्चित साम्य असते. कलाकृती ही अनुकृती असली, आणि तिच्यात व मूळ गोष्टीत साम्य असले, तरी त्यांच्यात एक महत्वाचा भेद आहे. कलाकृतीचा संबंध मूळ गोष्टीच्या केवळ ऐंद्रीय स्वरूपाशी असतो." पुढे पाटणकर बुचर ह्यांची साक्ष काढीत म्हणतात की "कलाकृती आपले लौकिकतेपासून विमोचन करते". ह्याचे सोपे उदाहरण घ्यायचे झाले तर कै.अरूण काळे ह्यांनी एका कवितेत शहरातल्या पॉश अशा मॉल मध्ये एका मोळी-विक्याला जागा मिळत नाही, त्यावरच्या दु:खावर एक कविता केलेली आहे. आता समाजशास्त्राच्या अगर पर्यावरणाच्या शास्त्रीय निरिक्षणांनी पाहिले तर शहरात मोळी-विक्या असणे दुरापास्त व गॅस ऐवजी लाकडांचे सरपण वापरणे नुकसानकारक, हे कोणीही मानील. पण मोळी-विक्याचे दु:ख ( कवितेतले ) तितकेच मनोहारी व प्रभावी आहे, हेही आपण नाकारू शकत नाही. कवी ग्रेस ह्यांना कलेविषयी व निर्मिती प्रक्रियेविषयी खरेच काही गहन लिहायचे असते तर त्यांनी ते सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या पठडीत लिहिलेही असते. ते स्वत: फाइन आर्टस्‌च्या वर्गाला सौंदर्यशास्त्र शिकवीतही असत. पण त्यांनी ह्या पुस्तकात ललित-निबंधांच्या अंगाने किंवा एका प्रकारे काव्याच्या माध्यमातच आपले भाव मांडले आहेत. इथे सय होते ती विंदा करंदीकरांच्या ज्ञानपीठाची. ते दिले गेले होते "अष्टदर्शने" ह्या तत्वज्ञान्यांची ओळख करून देणार्‍या काव्याला. त्या पुस्तकाचे माध्यम जरी कविता असले तरी ते होते तत्वज्ञानाचे. विंदा करंदीकरांनी "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र"ही लिहिले आहे. काव्याबद्दलची मते ते चाहते तर कवितेनेच व्यक्त करू शकले असते. पण ते त्यांनी रीतसर निबंधातून केले. इथे ग्रेस ह्यांनी त्यांचे मनोगत लालित्यपूर्ण अशा ललित निबंधातून केले असल्याने त्यात त्यांच्या भावभावनापेक्षा इतर तर्कविषयक बाबी शोधणे किंवा त्यांचे वैगुण्य दाखवणे अप्रस्तुतच होते.  
    कवी ग्रेस हे एक अवघड कवी आहेत. त्यांचे ललित निबंधही तितकेच अवघड असतात. तशी वाक्ये सोपीच असतात, पण अर्थ क्वचितच हाती लागतो. आता निर्मिती संबंधी त्यांनी ह्या पुस्तकात ठिकठिकाणी काही भाष्ये केली आहेत ती पाहून काही उलगडा होतो का ते पाहू, किंवा वर म्हटल्याप्रमाणे निर्मितीविषयी त्यांच्या भावनांना दाद देऊ :
१) ( पृ.२) "कलाकृतीची निर्मितीपूर्व अवस्था आणि निर्मिती झाल्यानंतरची रूपचर्या, एकातून एक निघावे म्हटले तरी त्यांच्यात खरे तर कुठलेही दिलाशाचे किंवा संशयाचे साम्य आढळूनच येत नाही. असे का व्हावे ?"
आता हे काही स्पष्टीकरण नसून केवळ एक निरिक्षण आहे व ते कवीला पडलेले एक कोडे आहे, असेच वाटते. एरव्हीच्या कलावंत नसलेल्या सामान्य माणसाने "करायला गेलो गणपती आणि झाले माकड" म्हणावे, तसेच हे भाष्य वाटते. ह्यातून एवढेच प्रतीत होते की निर्मिती ही एक गूढ प्रक्रिया असून त्यात आधीचे रूप व नंतरचे रूप ह्यात अभावानेच साम्य आढळते. ह्या प्रांजळ जाणीवेचे कौतुकच करायला हवे.
२) ( पृ.३) "एखाद्यावेळी शब्दाला थोडासा स्पर्श केला की त्याच्या आतील रक्तवाहिन्या एकदमच थरारून उठाव्यात आणि आपल्याला श्वास घ्यायची मुभा न देताच त्यांनी आपल्या पेशीचा तुकडा, चिमुकला तुकडा, तोडून त्याची बालकवीय, बोन्साय, प्रतिमा तयार करावी, तसे काहीसे ?"
शब्दांच्या लोभावण्याचे कर्तब अनेक कवींनी ह्या अगोदर वाखाणलेले आहे. जसे तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग: "आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥". कवी ग्रेस ह्यांचे वैशिष्टय असे की ते सध्या प्रचारात नसलेले अनेक शब्द वापरतात. हे भाषेच्या संवर्धनासाठी खासच महत्वाचे व प्रसंशनीय आहे. शिवाय ग्रेस ह्यांचे काही आवडते शब्द आहेत. जसे "वाकणे". ते इतक्या ठिकाणी वापरतात की कित्येक ठिकाणी हे लौकिकातले वाकणे, वाचकाला असंभवनीय वाटावे. जसे ( पृ.१८) वरच्या ह्या ओळी पहा:
"हले काचपात्रातली वेल साधी
निनादून घंटा तशा वाकल्या,"
आता घंटा वाकवण्याचे कवीचे कसब वाखाणावे का पुढच्या ओळींशेवटी त्याने "खिळ्यांना दिसेना कुठे क्रूस न्यावा / प्रभूने अशा पापण्या झाकल्या..." ह्या योजनेला "वाकल्या" चांगले जुळते, ही निकड महत्वाची मानावी ? खैर, शब्दांत अनेक अर्थ दडलेले असतात व ते कवीला प्रसंगी सादावतात ही निर्मितीतली प्रक्रिया मात्र आपण इथे सहजी ( वाकून ? ) मान्य करू शकतो.
ग्रेस ह्यांच्या शब्दकळेत काही फार गोजिरे शब्द वास करून असतात. जसे: पडशाळा, स्मरणशाळा, साऊल, सारणी, अन्वयरीत,गोंदणगाव, गोंदणधून, सृजनगंध, वाळवीची कुळे, स्पर्शभुलीचे हुंकार, वगैरे. त्यांची ही निर्मिती-घनता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
३) ( पृ.३) "प्रत्येक अनुभवाला अंतर्रचनेच्या बांधणीचे एक सूत्रनाते असावे, असा माझा अंदाज आहे. आणि ह्या सूत्रनात्याची संघटना निव्वळ सेंद्रीय गुणधर्म अंगानेच होत असावी."
हे मोठे प्रांजळ व सरळ कथन आहे. जात्यावर बसल्यावर ओवीच सुचते असे आपण म्हणतो, तेव्हा ह्याच तत्वाने ते होत असते. आता अर्थात कोणी जात्यावर "कोलावेरी, कोलावेरी...डी" म्हटले तर तेही खपेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. पण सामान्यत: जसा भाव असेल त्याच अंगांच्या रचनेची कविता होते हे सार्थच म्हणावे लागेल. ह्याचसाठी तर सात्विक भावांसाठी अजूनही आजचे कवी अभंगांचा वापर करतात. प्रेमाला ग़जलच चांगली ठरते. इथे पु.ल.देशपांडेंचे एक वाक्य आठवते. ते म्हणत की कधी काळी जर वाघ माणसांच्या भाषेत बोलला तर तो उर्दूतच बोलेल. इतका उर्दूचा लेहेजा आहे. कदाचित ह्याच कारणाने असेल निर्मितीच्या, कलेच्या विश्लेषणासाठी, कवी ग्रेस ह्यांनी सौंदर्यशास्त्रीय निबंधाची निवड न करता ललित निबंधाची निवड केली असावी.
४) ( पृ.४) "कलाकृती जीवनातूनच निर्माण होते, हे खरे आहे. पण कलाकृतीत व्यक्त झालेले जीवन हे साक्षात जीवनाशी निगडित असले, तरीही त्याचे ते कुठल्याही सबबीवर बांधील नसते."
( पृ.९५) "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष असणारच. पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी, परिपूर्णतेकडे झुकणारा असेल, म्हणून रेम्ब्रां, रिल्के, टॉलस्टॉय, व्हिन्सेंट या रंगशब्दपुत्रांना कुर्निसात करताना कुणीतरी सूफी फकिराच्या बाण्याने ओरडलेच आहे. जीवन हे निर्माण आहे, निर्मिती नाहीच, पुनर्निर्मिती तर मुळीच नाही. "
ऍरिस्टॉटल व बुचर ह्यांच्या सौंदर्यशास्त्रीय मतांनुसार हे विधान एकदम तार्किकतेचे आहे व ते कुठल्याही गंभीर विवेचनात मान्य व्हावे असेच आहे. सामान्यांना "कवी तो होता कसा आननी" हे कुतुहूल खूप दाट असते खरे, व कदाचित म्हणूनच आपल्याकडे म्हण तयार झालेली असावी की "नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये". आता प्रत्यक्ष जीवन व कवीचे काव्यजीवन हा विषय निघालाच आहे तर काही गोष्टींचा निर्देश करायला हरकत नाही. पहिले म्हणजे कवी ग्रेस हे एकमेव असे कवी आहेत की जे आपले काव्यजीवन व प्रत्यक्ष जीवन टोपणनावानेच जगतात. फार थोडयांना त्यांचे नाव--माणिक गोडघाटे--आहे हे माहीत असते. हे बेमालूमपणे प्रत्यक्षात काल्पनिकता मिसळणे, हे कसब कवी ग्रेस अगत्याने जोपासतात. त्यांच्या कवितांतून, ललित-निबंधातून भेटणारी नावे, ( जसे: रामदास ( भटकळ), केशव ( जोशी ), मधुकर ( केचे), विराणी, मिथिला, ह्रदयनाथ ( मंगेशकर), दुर्गा ( भागवत), जी.ए.( कुलकर्णी), लता मंगेशकर, राघव, वेल्लोरचे हॉस्पिटल वगैरे ) ही नावे प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तींची असतात व ती त्यांच्या काव्यात मुक्तपणे येत असतात. शिवाय ते ह्रदयनाथांबरोबर एक अनोखा कार्यक्रमही पेश करतात. ह्या सरमिसळतेत मग वाचकांना काही प्रत्यक्षातल्या गोष्टीही कळत जातात. जसे त्यांना नुकताच झालेला कॅंसर व त्यावरचे मंगेशकर हॉस्पिटलातले उपचार. कवीच्या कलाकृतींवर कदाचित ह्या आजाराचा परिणाम नसेल होत, पण वाचकांना ते कळल्यावर जी साहजिक करुणेची सहानुभूती निर्माण होऊ शकते, त्याचे काय होत असावे हा प्रश्न राहतोच. पुरस्कारांचेही एक वेगळेच जग असते. जेव्हा तरुण कवीची निर्मितीक्षमता व कल्पना भरार्‍या घेणारी असते, तेव्हा हे पुरस्कार मिळत नसतात तर अगदी अंत:काळीच बरसतात. विंदांनी जेव्हा कविता करणे सोडून दिले, त्यानंतर त्यांना ज्ञानपीठ मिळाले. ऑलिंपिक असे एकच क्षेत्र आहे जिथे तरुणांना तिथल्या तिथच्या कामगिरीवर सुवर्णपदके देतात. एरव्हीच्या जगात त्यासाठी कवीचे संचित गोळा व्हावे लागते.
५) ( पृ.४) "कला अशा जीवनाची पुननिर्मिती करते. आणि या प्रक्रियेत तो अनुभव, जीवनाची जी आकृती कलारूपात साकार होते ती निर्दोष आणि परिपूर्ण असते. तेव्हा कलारूपातील जीवन, हा साक्षात जीवनापुढचा मोठा भयावह दंडक, आणि चिरकालिक आदर्श असतोच. कारण जीवनाच्या फटी आणि उणिवा बुजविण्याचे कार्य करणे, हेच कलाकृतीचे धर्म असतात. "
कलेवर हे धर्म लादणे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने विवादास्पद आहे. कांटच्या म्हणण्याप्रमाणे कलेत हेतुरहित हेतूपूर्णता असते असे मानले तर मग जीवनाच्या फटी व उणीवा बुजविणे हे कलेचे धर्म कसे मानता येतील ? तर्काने इथे विवाद उत्पन्न होत असला तरी जीवनाच्या फटी आणि उणीवा बुजविणे हे कलाकृतीत घडतच नाही असेही आपण म्हणू शकत नाही इतके ते हरघडी होत असते.
६) ( पृ.८) "अस्पष्टता, धुकेपण, संदिग्धता, गूढता या सर्व अनुभवसिद्धीच्या मालिका म्हणजे वास्तवाच्या विरोधात ठाकलेल्या कैदाशिणी आहेत असे आपण समजून बसलो आहोत. आणि मग गूढसंमोहनमार्गातील या कैदाशिणीच्या, हडळींच्या नग्ननृत्यापेक्षा, वास्तवातील शामियान्यात सुरू असलेला नजरबंद अप्सरांचा नाच, ( इट बीइंग फुल ऑफ क्लॅरिटी ), उत्तमच राहणार."
गूढतेचे, ग्रेस ह्यांच्या कवितेत पदोपदी भेटणार्‍या दुर्बोधतेचे इथे कवी उत्तम समर्थन करीत आहे. त्यांचे टोपण नाव, कवितेत प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे उल्लेख, खर्‍या घटनांचे उल्लेख, अफलातून शब्द, हे त्यांचे गूढता वाढवण्याचे हमखासचे हातखंडे आहेत. त्यात अनवधानाने मुद्राराक्षसाच्या चुकाही त्यांना मदत करतात. जसे: ( पृ.९३) "हर मुद्दई के वास्ते दारो रसन नही", इथे "दारो रन" हवे होते. त्याचे "रसन" केल्याने ते दुर्बोध होते. किंवा "कोनाडयात विंचू आणि तिथे निरांजन / नांगीसाठी ज्योत झाली विधात्याचे घन" ही मूळ पुस्तकातली छपाई ते आता सुधारून "घन"ची "धन" करतात. जे मूळ पुस्तकाबरहुकूम "घन"शी झटत राहिले त्यांची अवस्था विचारूच नका. म.वा.धोंडांनी तर ह्या धुकेपणाचे कौतुक केल्याने धुकेच वास्तव शिल्पापेक्षा विलोभनीय ठरले आहे, असा ह्या दुर्बोधतेचा महिमा आहे.
७) ( पृ.१७) "निर्मितीच्या क्षेत्रात अशी कुठलीच सोय नाही. कारण इथे व्युत्पत्ती, व्याकरण, सुबोधता, आणि लौकिकाची सभ्यता यांचा मागमूसही नसतो. भाषा इथे कार्यकारी असते. ती लौकिकातलीच भाषा असते; पण तिच्या मांडणीचे, सर्व विभाव, अनुभाव, लौकिकातील जगण्याच्या जीवनविनिमयाशी संबंधित निर्मितीतील भाषा प्रतिमांच्या संभवामुळे आणि कलावंताच्या कल्पक सृजन उद्‌भवामुळे, आपले स्वत:चे सौंदर्यसन्मुख, अबाधित, पुननिर्माण करीत असते. त्यामुळे तिचा अनुक्रम, तिची प्रतवारी लावताना व्याकरण, व्युत्पत्ती, यांच्या नियमाप्रमाणे जीवनासक्तीचा क्रियावंत आग्रहही धरता येत नाही. ती प्रतिमांच्या द्वारे सतत सौंदर्यबंधांचे जोडपूल निर्माण करीत जाते. म्हणून जितकी ती जीवनाशी सलगी करत जाते तितकीच ती जीवनाशी लगटही टाळत जाते ."
( पृ.४६) "ही संभाव्य, असंभाव्य, कलावंताच्या निर्मितीतील तरलता पकडण्यासाठी खरेच का जीवाला मृतांच्या धर्मांची शाल पांघरूनच वावरावे लागते ? आणि ही तरलता संतांच्या, महंतांच्या, प्रेषितांच्या कुडीत संभवत नाही. ती फक्त कलावंताच्या निर्मितिशील आत्म्याची कायम, कायमची माहेरवाशीण असते."; "कलावंताच्या निर्मितीप्रक्रियेत, या विदग्ध लहरीत, तरलतेला एकाकीपणाचे वरदान लाभले आहे. वादच नाही. पण या एकाकीपणाला एकट, एकाकी होण्याची अभेद्य अटळ जोड देण्याशिवाय ही तरल लहर चिमटीत पकडताच येत नाही."
कदाचित कलावंतांना भोवणारी एकाकी पणाची जाणीव ही ह्याच "जीवनाशी लगटही टाळत" जाण्याने होत असावी. आणि समाजाचा भाग म्हणून कलावंताला जीवनाशी सलगी करावी लागते त्यामुळे ह्या द्वंद्वाने एक प्रकारचा लहरीपणाही कलावंतांना येत असावा. तशात तरलतेचा शाप कलावंतांना असतो हे आपण प्रत्यही पाहतोच. ह्या तरलतेपायी परत एकाकीपण कसे येते हे सांगणे हा मोठाच आत्मानुभव मानावा लागेल. हे निरिक्षण कलावंताची अडचण सांगणारे नक्कीच आहे.
८) ( पृ.२३) "सृजनभाषा गवसली तर तेवढयाने खरोखरच सृजनाचा ठाव घेता येतो ?"; "कुठलाही सृजनगंध लाभलेला अनुभव पाठीचा नसतो आणि पोटाचा नसतो. तो मुळात निरंगी आणि निराकार असतो. त्याला एखाद्या झाडाला फांद्या फुटाव्यात , सजीव गर्भाला अवयव फुटावेत त्याप्रमाणे त्या अनुभवाचे चित्र, कृती आणि आकारबंधामध्ये रूपांतर होत जाते आणि हा निरंगी अनुभव स्वत:च आकाराचा निराकार स्वामी आहे, असा भास होऊ लागतो."
( पृ.७३) "कलावंत आपल्या निर्मितीतून कोणत्याच शक्तीची शक्यता गोंजारत नाही. शक्ती वेगाने येते आणि वेगानेच कोसळत निघून जाते. कलावंताचा बाणा शक्तीवर नाही तर क्षमतेवर अवलंबून असतो. अनंत क्षमतांची शक्यता निर्मित जाणे, हेच कलेचे कार्य आहे. क्रिएटिव्हिटी नेव्हर डिमान्डस द स्ट्रेंग्थ बट ओन्ली कॅपॅसिटी."
इथे कवीने स्वत:चे भाव मोठ्या स्पष्टतेने प्रगट केले आहेत. आलेला विचार कसा आकार घेईल त्याचे नेमके वर्णन पाटणकर एके ठिकाणी फार मार्मिकतेने करतात. ते "उर्मी"ला वा संकल्पनेला झाडातून स्त्रवणार्‍या डिंकाची उपमा देतात. काही अनामिक वेदनेने हे स्त्रवणे होत असते व ते कसा आकार घेईल त्याचे काहीच सांगता येत नाही. कधी डिंकाची लांबट तार निघेल तर कधी घट्ट गोळा आकारास येईल. वरील ग्रेस ह्यांचे प्रकटन ह्याच अर्थाचे आहे व ते अगदी पटणारे आहे.
९) ( पृ.५९) "संकल्पना हे माझ्या जीवनव्यवहाराचे आणि निर्मिती व्यवहाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे, हे आता जणू काही ठरून गेल्यासारखेच आहे.";
( पृ.६१) "मी माझ्या तथाकथित निर्मितीसंकुलात असताना, वावरत असताना, बांधणी तत्वांच्या मागे असलेली व्यवस्था कधीही भेदाने, वेधाने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला नाही.";
( पृ.७२) "भूतकाळाचा त्याग करणे ही माझी जीवनप्रेरणा नाही. ती माझी निर्मिती प्रक्रियाही नाही."
( पृ.३७) "कलाकृतीची निर्मिती अशी होत असते. त्याचप्रमाणे अतीव सावधानतेने कलावंत जीवनाची पुनर्मांडणी करीत नसतो. आणि पुनर्मांडणीच्या रूपाने तो जीवनाची नीतिसंपन्न मांडणीच केवळ करीत नसतो तर त्याची अंतिम सौंदर्यसंपन्नता प्रस्तावित करीत असतो. जीवनाला हा साक्षात्कारी चमत्कार कधीच साधत नसतो. पण अशा साक्षात्कारी चमत्कारांची मांडणी करीत जाणे, हेच कलेचे अधिष्ठान असते."
सगळ्याच माणसांच्या मनात विचार येत असतात. पण इथे ग्रेस त्याला संकल्पना असे संबोधून सांगत आहेत की आलेले विचार त्यांनी प्रामाणिकपणे अमलात आणले आहेत. आणि हे कलावंताचे व्यवच्छेदक लक्षण आहे हे आपण त्यांच्या हेकेखोरपणावरून सहजी मान्य करू. तसेच त्या विचाराला लौकिक भेदाभेदाचे निकष त्यांनी लावले नाही, हेही कोणाही कलाकाराबाबत आपल्याला पटण्यासारखेच आहे. मात्र ते जेव्हा म्हणतात की मी भूतकाळातच रमतो, तेव्हा ते चांगले की वाईट हे समजत नाही. त्यांचे सगळे ललित निबंध पाहिले तर त्यात सर्व ३०/३५ वर्षांपूर्वीच्या कवितांचेच जणू समर्थन सापडते. सृजनाच्या दृष्टीने विचार केला तर हे प्रतिभा संपल्यासारखेच वाटू शकते. ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमातही ते जे कविता बोलत असतात त्या सगळ्या ३०/३५ वर्षांपूर्वीच्याच असतात. हे कोणाला भूतकाळात रमण्याबरोबरच प्रतिभा आटल्यासारखे वाटू शकते. स्वत: कवी ग्रेस आपल्या अर्पण पत्रिकेखाली सही करून तारीख देतात : ११ सप्टेंबर २००७ व त्याला म्हणतात : अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी...अस्तपर्वाचे हे त्यांचे प्रांजळ जाण असणे मोठे मोहक आहे.
असेच त्यांच्या रात्री अपरात्री होणार्‍या, कविता सुचण्याच्या साक्षात्काराचा खूप बोलबाला आहे. कविता सुचणे, तेही रात्री अपरात्री, ह्याला खुद्द दुर्गा भागवतांनी दैवी म्हटलेले आहे. आणि सृजनाच्या भाषेत ते खरेच दैवी आहेही. पण समीक्षेत सुचलेली कविता ज्यास्त मानाची व जुळवलेली कविता कमी मानाची असे काही दर्जे केलेले नसतात. त्यामुळे त्यांचे हे साक्षात्कार दैवी मानले, तरी साहित्यात ते केवळ अवेळी सुचलेले आहेत, म्हणून आपण ते मोठे ठरवणे देवभोळेपणाचे होईल. कवी ग्रेसनाही ते आवडू नये असे हे कारण आहे.
१०)  ( पृ.१०३) "कलावंताची निर्मितीप्रक्रियाही आतून केवढी घनदाट, व्यामिश्र आणि आततायी असते याचा अदमासच घेता येत नाही. निर्मितेप्रक्रियेमध्ये टाहो असतोच. पण एक प्रकारचा त्या टाहोला वरच्या वर, अधांतरी तरंगत ठेवणारा एक धा धा वो असतो. म्हणजे त्या त्या अनुभवांच्या हंबरातील धावा मुखर होत असतो."; "ही एक वाट आहे. या वाटेने जाताना, निर्मितीचा विश्वप्रदेश कितपत तुम्हाला सापडेल, हे त्या त्या कलावंताच्या भावानुभूतीच्या अदमास आवाक्यावर अवलंबून असते. आणि त्यावरूनच कलावंतांच्या परी, परिमिती, आणि परिमाणे निश्चित होत असतात."
हेच तत्व कवी ग्रेस त्यांच्या ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमात मोठ्या आर्ततेने सांगतात. त्यासाठी ते तुकारामाने अंगावर कढत पाणी फेकले तेव्हा धावा केला त्याचे उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणाले होते: जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥ तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥"
भावनेच्या उत्कटतेचा हा मरातब कवी ग्रेसना आविष्काराच्या सच्चेपणासाठी मोठा महत्वाचा वाटतो. ह्या वाटण्याच्या प्रखरतेच्या प्रमाणांवरून कलावंतांचे मोजमाप करावे असेही ते सुचवतात. कोणाही कलंदर कलावंताचे लौकिक आयुष्य पाहिले तर ते त्यातले दु:ख किंवा पीडा ह्या आविष्काराच्या सच्चेपणापोटीच सहन करतात की काय असा संशय बळावतो.
    परमेश्वराची इच्छा नसेल तर झाडाचे पानही हालत नाही, असे कधी कधी वारा नसला की आपण म्हणतो. ते देवाची महत्ता ठरवणारे असले, तरी रान कशाने हलते हा मुळचा सृजन-शोध पूर्ण होतच नाही. निर्मितीची उर्जा म्हणजे वारा, व त्या वार्‍याने हालते रान, अशी कवी ग्रेस ह्यांची कल्पना आहे व त्या वार्‍याला चिमटीत पकडण्यासाठी ते ह्या पुस्तकात एक प्रकारे "रान" उठवत आहेत, हे मात्र निर्विवादपणे वाचकाला जाणवत राहते. त्या रानात घुमलेली ही एक शीळच !
    (कवी ग्रेस ह्यांची ख्याती अशी की ह्यांचे शब्दांकडे इतके बारीक लक्ष असते की एक पुस्तक प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिला अर्पण करताना तिच्या नावाचे स्पेलिंग ई पासून आहे की आय पासून ह्याबद्दल जी.ए.कुलकर्णींशी खल करून त्यांनी चक्क तिच्या पी.ए.लाच पत्र लिहिले होते. अशा कवीच्या व पॉप्युलरसारख्या दर्जेदार प्रकाशकाच्या इतक्या चुका ह्या पुस्तकात असाव्यात हे खेदाचे आहे. ते इतर वाचकांसाठी म्हणून कोणाला तरी एकदा सांगणे भागच आहे. म्हणून चुकांची ही यादी : ( पृ.०) "रसन"--पृ.९५वर उदध्रुत केल्याप्रमाणे "दारो रन" हवे; ( पृ.३) "झुळका" हे "झुळुका" हवे ; ( पृ.७) "तारेचे" हे "तारेने" हवे ; ( पृ. १२) "साऊलने काळाचा आधार घेऊन...." हे बोध न होणारे वाक्य ; ( पृ.१२) "अनुकंपा साकार करतो" हे "अनुकंपा साकार करते" असे हवे; ( पृ.१३) "..विचारात पडलो की,.." हे "विचारात पडतो" हवे; ( पृ.१४) "She definately" हे "definitely" हवे ; ( पृ.१५) "नेहेमीच" हे "नेहमीच" असे हवे; ( पृ.१७) "तार्किक हिरिमिरीने" हे "तार्किक तिरिमिरीने"असे हवे; ( प्रु.१९) "घंटा तशा वाकल्या" ह्यात घंटा वाकू शकत नाहीत हे खटकते ; ( पृ.२०) "तोंडीतोंडीच" ऐवजी "तोंडातोंडीच" हवे; ( पृ.२३) "गोंदण सुर्‍यांचा" ऐवजी "गोंदण सुयांचा" हवे; ( पृ.३१) "तिने कन्येला दिलेला" ऐवजी "मी तिच्या कन्येला" असे हवे; ( पृ. ३२) "...then just" ऐवजी "than just" असे हवे; ( पृ. ३२) "...मधुर अन्वयार्थ त्यांनी" ह्यात "त्यांनी" गाळावे; ( पृ.७५) "..जाहीर करून टाकला. त्याचबरोबर..." इथे पूर्ण विराम नको आहे; ( प्रु.७८) "Let the sun be over our heads.." ह्यात वाक्य पूर्ण होत नाही; ( पृ.८०) "proved" ऐवजी "proven" हवे; ( पृ.८०) "raindear" चे स्पेलिंग "reindeer" असे असायला हवे; ( पृ.८४) "देहलीवरून" इथे "देहलीजवरुन" हवे; ( पृ.८५) "पोवळेपण" ऐवजी "पोळलेपण" हवे; ( पृ.८५) "..नसताच, जिथे" इथे पूर्णविराम हवा; ( पृ. १००) "करयचा" ऐवजी "करायचा" हवे; ( पृ. १०५) "even too" ऐवजी "do" हवे; ( पृ.१०८) "fulfil" ऐवजी "fulfill" हवे; ( पृ.१०९) "तर तर ते" ऐवजी "तर ते" हवे; ( पृ.११८) "माझा प्रस्तुत" ऐवजी "माझ्या प्रस्तुत" हवे; ( पृ.१२१) "tringle" ऐवजी "triangle" हवे; ( पृ.१२२) "tombe" ऐवजी "tomb" हवे; ( पृ.१२२) "gloria" ऐवजी "glories"हवे.)

----------------------------------------------------------------------------
*"वार्‍याने हलते रान"
कवी: ग्रेस,
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन, पाने:१२२, किंमत:१५०र

--------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई: ४०००७७
( भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२)

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२



--------------------------------------------------------------------
"वार मेड न्यू"
ले: मॅक्स बूट
गोथॅम प्रकाशन, २००६, पाने ७२१, किंमत ( फ्लिपकार्टची:र.१५५१)
----------------------------------------------------


वाचाल तर वाचाल---११
अमेरिकेची जय्यत तयारी
    सध्याच्या जगात अमेरिका हाच एक देश असा आहे की जो ह्या ना त्या कारणाने लढाया करतो आणि त्यात हमखास यश कमावतो. त्यांच्या आर्थिक सुबत्तेचे आपल्याला आकलन असतेच, पण अनेक वर्षे ते ह्या लढाईच्या क्षेत्रात आपले म्होरकेपण कसे टिकवून आहेत ह्या बद्दल आपल्याला कुतुहूल वाटते व ते साहजिकच आहे. वरील पुस्तक ह्या कुतुहूलाचे यथोचित स्पष्टीकरण देणारे असून ह्यात अमेरिकेच्या लढायांमागची तयारी, नवीन संशोधने, सैन्याची संघटना वगैरे स्थूल निकषांची उकल केलेली आहे.
    साधारणपणे "युद्धस्य कथा रम्य:" ह्या न्यायाने आपल्याला युद्धाबद्दल खूप आकर्षण असते खरे, पण त्यातल्या बारकाव्यांची कोणी इतकी उकल करुन तपशीलवार माहीती देत नाही. शिवाय ही लष्कराची गुपिते असल्याने बरेचसे देश ही माहीती गुलदस्त्यात ठेवतात. पण अमेरिकेचे लोकशाही शासन व त्यातली पारदर्शकता ह्यामुळे इथे लेखक चक्क आपल्याला लष्करांची नवीन आयुधांची माहीती देतो आहे, हे फारच आश्चर्य करण्यासारखे आहे. उदाहरणार्थ ह्या पुस्तकात अमेरिका सध्या कोणत्या आयुधांची तयारी करते आहे ही माहीती मोठी मनोरंजक व डोळे उघडणारी आहे. जसे : लेखक आपल्याला सांगतो की जगप्रसिद्ध मॅचेसुचेटस्‌ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( एम आय टी ) ह्या विद्यापीठाशी अमेरिकन लष्कराने ५० मिलियन डॉलर देऊन एक "इन्स्टिट्यूट ऑफ सोल्जर नॅनोटेक्नॉलॉजीज" नावाची शाखा काढली आहे. त्यात नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन अमेरिकन सैनिकासाठी एक युनिफॉर्म शोधणे चालू आहे. हा युनिफॉर्म असा केलेला असणार आहे की सैनिक सदैव, २४*७ , इंटरनेटद्वारे मुख्य कार्यालयाशी, वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्कात राहू शकणार आहे. त्याचे हेल्मेट हे आपोआप व्हिडीओ, ऑडिओ, व टेक्स्ट मेसेजेस देईल, घेईल, इन्फ्रारेडद्वारे रात्री दिसण्याची सोय असेल, जीपीएस द्वारे मार्ग आपोआप दिसेल, आखता येईल. ह्या युनिफॉर्मचे कापड नॅनोचे असेल. ( एक नॅनोमिटर म्हणजे मिटरचा दहा लाखावा भाग व माणसाच्या केसाची जाडी, ५० हजार नॅनोमिटर असते, त्यावरून नॅनो हे किती बारकाव्याचे प्रकरण आहे त्याचा अंदाज यावा. ). ह्या युनिफॉर्मची खासियत अशी असेल की ह्याच्या जवळपास सेंसरस्‌नी काही आहे असे सांगितले की हे कापड केव्हलर-सारखे अतिकठिण होईल व दारूगोळ्याला रोखील. एकाचे असे झाले की सगळ्या सैनिकांचे युनिफॉर्मस् असे बदलतील. एरव्ही हा युनिफॉर्म अगदी हलका असेल. ह्यात वातावरणाप्रमाणे वातानुकुलितता असेल ( एअर-कंडिशन अथवा हीटर ) आणि सैनिकाची शक्ती अनेक पटींनी वधारण्याचीही सोय असेल. ( बर्कले विद्यापीठात तर १८० फूट उंच इमारतीवरून उडी मारण्याचे यशस्वी प्रयोग केव्हाचेच झाले आहेत असे लेखक नोंदवीत आहे.).
    एअरबोर्न लेझर नावाचे एक अति-विघातक शस्त्र अमेरिका तयार करीत आहे. बोईंग ७४७ विमानात हे लेझर तयार करण्याचे साधन ठेवलेले असते. फ्लुओरीन, हीलीयम व डेरेटीयम ह्यांच्या मिश्रणाने लेझर तयार होतो. एरव्ही पॅट्रियट-३ ह्या मिसाईल विरोधी अस्त्राला एकावेळेस उडवण्याचा खर्च ३.८ मिलियन डॉलर ( दर शॉटला) येतो तिथे ह्या लेझरचा खर्च अवघा ८००० डॉलर ( दर शॉटला ) इतका कमी येतो. शिवाय पॅट्रियट-३ने काही मर्यादित मिसाईलच उडवता येतात व परत ते मॅगझीनमध्ये भरावे लागतात. त्यामानाने लेझर मिश्रण असे पर्यंत फटाफट, न थांबता, मारता येते. तांत्रिक दृष्टया लेझर प्रकाशाच्या वेगाने काम करीत असल्याने मिसाईलच्या वेगापेक्षा १६०,००० पटींनी मारा जलद होतो व पहिल्यापेक्षा किती तरी कमी पटीचा वेळ लागतो. इस्त्रायलच्या युद्धात रशियन मिसाईल पाडताना हे लेझर अमेरिकेने तावून सुलाखून वापरले आहेत व ते यशस्वीही झाले आहेत.
    आपण कधी कधी दिल्लीच्या निदर्शकांवर पोलीस कसे पाण्याच्या फवार्‍याचा मारा करतात व निदर्शकांना परतवण्याचा प्रयत्न करतात ते पाहतोच. ह्यात काही माणसे जखमीही होतात. तर अमेरिकेने ह्याहीपेक्षा परिणामकारक एक साधन विकसित केले आहे ज्याचे नाव त्यांनी ठेवले आहे: ऍक्टिव्ह डिनायल सिस्टिम ( सकारी नाकारण्याची रीत ). ह्यात एक मीटर चे मायक्रोवेव्ह तयार करून लोकांवर त्याचे झोत टाकतात. त्या झोतात लोक आले की त्यांच्या त्वचेच्या आत ( १/६४ इंच खाली ) हे मायक्रोवेव्ह जाऊन भयंकर दाह निर्माण करतात. झोताबाहेर गेले की लगेच थंड. हे आपल्याकडच्या सरकारांना कळायचा अवकाश की आपले निदर्शक चांगलेच होरपळून निघतील ( अमेरिकन मायक्रोवेव्हने ).
    आपण ह्या आधी वाचलेलेच आहे की अमेरिकेच्या प्रसिद्ध "स्टार वार्स" पद्धतीत दुष्मनाचा मिसाईल हवेतच गारद करण्याची तरकीब योजलेली आहे. आता अमेरिकेने अगदी लहान लहान सेटेलाईटस्‌ अंतराळात ठेवून त्याद्वारे एक नवीन आयुध तयार केले आहे. ह्याचे नाव आहे : "रॉडस्‌ फ्रॉम गॉडस्‌" ह्यात टंगस्टनच्या धातूचा एक रॉड, सेटेलाईटमधून शत्रूच्या मिसाईल वा लक्ष्यावर अचूक मारल्या जातो. ह्याने एवढा मोठा स्फोट होतो की कोणाला वाटावे जणू अणु-स्फोटच झाला आहे. पण ह्यात अणुचा स्फोट न करता परिणामकता मात्र अणुबॉम्बची साधली आहे.
    आजकाल अमेरिकन सैनिक पाकिस्तानात व अफगाणिस्तानात ड्रोन ह्या मानवरहित विमानातून बॉंम्ब-हल्ले करतात व त्यात नेमके अतिरेकी मरतात हे आपण वर्तमानपत्रात प्रत्यही वाचतोच. हेच ते ड्रोन म्हणजे अनमॅन्‌ड एरीअल व्हेहिकल. अशी अनेक पल्ल्याची मानवरहित विमाने अमेरिकेकडे सध्या आहेत. हे इंटरनेटमुळे जोडलेले असल्याने कुठूनही उडवून कुठूनही बॉंबहल्ले करता येतात. म्हणजे बॉंबहल्ला पाकिस्तानात व ते करणारा युवक अमेरिकेत फ्लॉरिडात बसून ते करतो आहे. तसेच सैन्यात अनेक खाती असतात. शत्रूच्या नेमक्या जागेची माहीती जर अमेरिकन गुप्त-हेर खात्याला ( सीआयए) असेल तर मग ह्या ड्रोन-हल्ल्यांचे सूत्रसंचालन ते खाते करते. बरे ह्या विमानात माणूस नसल्याने ते कित्येक दिवसच्या दिवस उडते ठेवता येते. शिवाय आत्ताचे त्यांचे नवीन ड्रोन तर ६० हजार फुटावरून उडणारे असल्याने शत्रुपक्षाला अजिबात न कळणारे आहे. फक्त त्यासाठी ढगातूनही दिसता येणे, रात्रीही दिसणे, व अचूक वेध घेता येणे ह्या तांत्रिक बाबी त्यात पुरवाव्या लागतात. आजकाल हे ड्रोन प्रकरण इतके सुळसुळाटले आहे की अमेरिकेला त्यात एक नवीन फायदा दिसतो आहे. तो असा की आता अमेरिकेला विमानांसाठी इतर देशात तळ मागायची गरज नाही. विमान वाहू  युद्धनौकावरूनही हे ड्रोन सोडता येतात. आजकाल तर ह्याचा इतका सर्रास उपयोग होतो आहे की ही चालवणार्‍या मुलांनी हे चालवण्याचे तास आमच्या "फ्लाईंग अवर्स" मध्ये मोजा व आम्हाला इतर वैमानिकाआधी बढती द्या अशी चक्क मागणीच केली आहे.
    ड्रोन सारखाच जमीनीवरून चालणारा ( एम यू एल ई ) नावाचा एक टॅंक आहे. ( मल्टीफंक्शन लॉजिस्टिक्स ऍंड एक्विपमेंट व्हेहिकल ). ह्यातही माणूस नसतो व तो सर्व पल्ल्याचे हल्ले करू शकतो. अमेरिकेने हे इराक युद्धात आधीच वापरलेले आहेत. रोबोटिक्स मध्ये नवनवीन संशोधन करून अमेरिका असे एकापेक्षा एक भारी आयुधे बनवीत आहे.
    ह्याशिवाय संगणकातले नवीन शोध वापरून कसे युद्धात वापरायचे, त्यांच्या सैन्याचे स्वत:चे कसे स्वतंत्र इंटरनेट आहे, अनेक खतरनाक जंतू ( जर्म्स ) वापरून जंतू-आयुधे कशी केलेली आहेत, वगैरे साद्यंत माहीती ह्या पुस्तकात वाचून एक लोकशाही असलेला देश इतकी संवेदनशील माहीती लोकांना कशी उपलब्द करून देतो ह्याविषयी कौतुक वाटते.
    पुस्तकाच्या समारोपात कुठल्या देशाचा वैश्विक संघर्षात वरचष्मा राहील ह्याचे भाकीत व समर्थन करताना लेखकाने एक चांगला तर्क दिला आहे. त्याच्या मताप्रमाणे जगात अनेक पुढारलेली आयुधे पुरविणार्‍या अनेक खाजगी कंपन्या आहेत व त्या प्रत्यही अनेक देशांना ही शस्त्रे पुरवीत असतातच. पण त्याने लढाईत शिरजोरी साधता येत नाही. ती साधायची असेल तर वेळप्रसंगी हवी तशी आयुधे सैन्याला संशोधित करता आली पाहिजेत. व हे करण्यासाठी त्या देशाचे सरकार व सैन्याची संघटना असे नवीन विचार जोपासणारी असायला हवी. ह्या संबंधात लेखक माजी लष्करप्रमुख डोनाल्ड रुम्सफील्ड ह्यांची जी माहीती देतो ती कोणाचेही डोळे विस्फारील अशी आहे. जसे: लष्करातून निवृत्त झाल्यावर रुम्सफील्ड ह्यांनी एक औषध कंपनी ( जी.डी.सर्ल ऍंड कंपनी ) विकत घेतली व ती भरभराटीला आणली व नंतर ती विकून जनरल इन्स्ट्रूमेंटस्‌ कॉर्पोरेशन नावाची कंपनी प्रमुख म्हणून चालवली. ज्याला तंत्रज्ञानाची खाजगी क्षेत्रातली ही महती माहीत आहे त्यालाच लष्करात तंत्रज्ञानाचे महत्व कळणार व म्हणूनच ते अमेरिकन लष्करात वरील संशोधन करवून नवीन आयुधे निर्माण करू शकले. आणि रुम्सफिल्ड ह्यांना त्यांच्या लष्कराने हे सर्व करू दिले. ( नाही तर आमचे जनरल्स बघा कसे जन्मतारखेच्या वादातच अडकून पडले आहेत. ).
    पुस्तक प्रचंड मोठे झाले आहे. त्यात लेखकाने इ.स. १४९४ पासूनच्या लढायांची प्रकरणे का घातली आहेत ते कळत नाही. प्रत्येक लढाईतून जिंकणार्‍याला व हरणार्‍याला निश्चितच शिकण्यासारखे असते हे खरे, पण त्यासाठी ह्या लढायांची इतकी साद्यंत माहीती वाचायची म्हणजे वाचकाचा अंतच पाहणे आहे. उदाहरणार्थ इंग्रजांशी मराठ्यांची जी लढाई झाली त्याचे रसभरीत वर्णन करून लेखक निष्कर्ष काय काढतो तर, मराठे संख्येने ज्यास्त असून, त्यांचे आरमार ज्यास्त बलशाली असूनही इंग्रज का यशस्वी झाले तर त्यांच्या शिस्तीमुळे व धारिष्ट्यामुळे व मराठे का हरले तर त्यांच्यातल्या दुहीमुळे, संघटना कौशल्याच्या अभावामुळे व शासनातल्या ढिसाळ कारभारामुळे. आता एवढ्या ऐतिहासिक निष्कर्षासाठी शंभर पाने खर्ची घालणे हे लेखकाचे कसब समजायचे का इतर पुस्तकातून केलेले "कट, पेस्ट"ची करामत समजायची ?
    इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही अशी अमेरिकन लष्कराची गुपित माहीती ह्या पुस्तकाद्वारे सामान्यांना उपलब्ध होते आहे हे आपले भाग्य व त्या सरकारचे कौतुकास्पद पारदर्शकतेचे उदाहरण आहे हे मात्र नक्की. अवश्य वाचलेच पाहिजे असेच हे पुस्तक आहे. व ते २००६ साली प्रसिद्ध होऊनही फरीद झकारिया ह्यांनी त्यांच्या जीपीएस ह्या सिएनएनवरच्या कार्यक्रमात सुचविले हे अभिनंदनीय बाब आहे.

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
------------------------------------------------------------------------------------

  Fighting-fit USA
    War stories are always alluring and perhaps we are all “a war-mongering species” in the universe. This book published in 2006 is a tribute to these basic instincts and some of the details that it provides, make us realize as to why USA, in spite of all economic hurdles keeps herself “a fighting-fit ” nation.
    All kudos to the transparent traditions in a democratic nation when in the closing chapters, author acquaints us with all the latest armament research that USA is currently undertaking. One does not get to read such supposedly secret details at other times and it amazes us on the incredibility of creative thinking in arms research. For example, we never knew that, “In 2002 the U.S. Army provided a $50 million grant to set up the Institute for Soldier Nanotechnologies at the Massachusetts Institute of Technology.”  Here they are working on a nano-technology aided uniform which will enable them to be in contact 24X7 with others, the helmet, with night vision, would send and receive video, audio and text messages, in addition to having GPS, laser finders and sensors that will detect surroundings and will have ability to convert to a hardest protective gear like made of Kevlar. ( A nano-meter is a billionth of a meter and for sake of judgment, human hair’s width is about 50,000 nanometers wide.). In normal wear the uniform would feel as if it were made of light cotton fiber, but if the interwoven sensors detected the presence of chemical, biological, or radiation weapons, it could instantly close its “pores” to become airtight—as would the suits of other soldiers in the vicinity. If incoming bullets or shell fragments were detected, the uniform could become many times harder. This is known as “active camouflage,” in contrast to existing “passive camouflage,” which stays one color. This “battle suit” would also have built-in heating and air-conditioning and possibly electronic augmentation to boost the power of human muscles.
    They are also developing The airborne laser. Unlike a patriot missile, it is cheap ( instead of 3.8 $M per shot of Patriot 3 missile, it costs only $ 8000 per shot of laser. ) and unlike limited magazine capacity of Patriot-3 the laser can keep on firing till the fuel lasts. ( The fuel is: a mixture of fluorine, helium and deuterium.). This airborne laser is fitted on a 747 plane and because of the higher speed of lasers, it can intercept the target 160,000 times faster than the speed of bullet. This is already used and proven in the missiles bombarded in Israel.
    In democratic countries, we have seen that it is common practice to spray cold water jets on the demonstrating crowds. US marines and air force is presently developing, at a cost of 40 $M , a system called Active Denial System. In this system a meter long microwave is created and directed at the protestors and this wave goes 1/64 inch deep under the skin and causes a huge burning sensation. It can’t be traced over, once the men step out of the way of the ray. A very effective and equally secretive crowd controlling measure, which all the rulers would love to experiment soon on us.
    In the famous “Star-wars” category, along with launching of many small weight satellites, America is now engaged in a special launcher called “rods from God”. These are pieces of tungsten rods which could be hurled at enemy targets, at a super high speed from the small satellites and will create an impact as if they are hit by some nuclear weapon. But it will be less lethal and cleaner than the nuclear weapon.
    We are already witnessing the success of the American drones at various vulnerable locations. These are technically called UAV ( Unmanned Aerial Vehicle ) and can fly at very high altitudes like 60,000 feet, and can drop very precisely guided bombs and can keep flying for days on without requiring a break. These can see through the clouds, and can drop bombs with pinpoint accuracy. These have become so convenient to operate from anywhere in the world that young boys are controlling these drones from Florida and the drones are dropping bombs at given locations in Afghanistan. Already this has become so common place, that in US air force the problem is whether to consider the drone-operating boys’ hours spent in USA, as “flying experience” and whether they could be suitably promoted over the actual pilots. Their bomb dropping precision is so marvelous that there are stories of intercepted al-quaida targets reporting that they got lucky and the house is saved and only car is burning outside, and thereupon the handler gives message to the drone operators to adjust their aim and take the house next to the burning car outside. And the greatest advantage of these drones is that America does not have to negotiate terms for air-bases with rouge countries and can operate drones from a limited space. Further amazement is to be awaited when the drones would come in size of a small insect.
    Army’s version of drones is being developed by DARPA ( defence advanced research projects agency) as MULE ( multi-function logistics and equipment vehicle ) which is robotized tank and has already been tried out in Iraq war. These advances in robotics is helping the USA army to drastically reduce the soldier strength without affecting the overall effectiveness.
    Apart from above, author narrates in the book, scores of new inventions being developed by USA’s military arsenal like germs warfare, various robotics and advantages of all information available to the soldier on the ground due to their own internet and power of computers.
    Author leads a very learned argument that Middle East and other countries can afford to get various military arsenal already commercially developed and available through regular arms suppliers but the way America is developing new technology is most effective because military establishment there can think of creativity due to unique structure they have maintained and encouraged. In this regard, it was surprising to read that Donald Rumsfeld, the general who could make the military to change its thinking, had a similar experience in private sector when he was chief of G.D.Searle &co.(a pharma company ) and made it successful and then moved on to acquire General Instruments Corporation. This shows that he was capable of understanding the importance of technology in modern warfare. On this background we shudder to think of our present day generals who are more worried about their Date of Birth than improving the technical skills of the army. It is so impressing to read how their military strategists give technical presentations and how their generals make the military to think innovatively.
    Why author has started this treatise with a war in Spain in 1494 is hard to understand. Sometimes it is used to strengthen author’s arguments that a superior strategy or simple boldness and discipline wins a battle in spite of odds. Author demonstrates this by narrating the battles Maratha rulers had with British ( Welesly) and how & why they failed. Perhaps this was unnecessary and author could well have avoided the temptation of “cut & paste” tendency by making the book so bulky. But it is no denying that for a war to be won, not only technology but organization of military, that country and of course the leadership of the country plays a vital role. And it is here that author’s meticulous details about new inventions in warfare and weapons make very interesting reading. For sake of understanding the present realities of world power and especially why USA keeps its leading edge in world affairs in spite of their difficulties, this book makes a huge contribution and is worth reading.
-------------------------------------------------------------------------------------------------------

“War made new”
By: Max Boot
Gotham Books Publication, 721 pages, Flipkart price:Rs.1551
Coverpage picture

-----------------------------------------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com


रविवार, १५ जानेवारी, २०१२




---------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट अमेरिकन वर्ल्ड--२.०( सुधारित आवृत्ती-२.० )
ले: फरीद झकेरिया
नॉर्टन ऍंड कं, प्रकाशन, पाने:२८२, किं:र ११६७(फ्लिपकार्ट)


वाचाल तर वाचाल---१०
अमेरिकेनंतरचे विश्व
    आपल्या टीव्हीवरची भांडणे ऐकून भंडावल्या गेल्यासारखे होते व त्या पार्श्वभूमीवर सीएनएन वरचा रविवारचा फरीद झकेरिया ( आपल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री, औरंगाबादचे, असलेले श्री. रफिक झकेरिया ह्यांचे धाकटे चिरंजीव ) ह्यांचा जीपीएस ( ग्लोबल पब्लिक स्क्वेअर, म्हणजेच वैश्विक चावडी ) नावाचा कार्यक्रम फार सुखद व वैचारिक थोरवीचा असतो. ह्या कार्यक्रमात ते नोबेल विजेते, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाचे प्रोफेसर्स, राजकीय पुढारी वगैरेंशी संवाद साधतात व जो कोणता विषय असतो त्याची सांगोपांग चर्चा, शिरा न ताणता, करतात. शिवाय एक महत्वाचे पुस्तकही ते दर आठवडयाला सुचवतात. ही पुस्तके मोठी विद्वत्तापूर्ण व वाचनीय असतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी लिहिलेले व नुकतीच सुधारित आवृत्ती काढलेले वरील पुस्तक अर्थातच, त्यांनी स्वत: सुचवलेले आहे.
    जगाच्या राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व किती आहे, ते आपण जाणतोच. पण जॉर्ज बुश ह्यांच्या फसलेल्या इराक युद्धानंतर व अमेरिकेतल्या आर्थिक संकटानंतर, त्यांची जी दाणादाण झाली व जगात अमेरिका सोडून इतर राजकीय सत्ता कशा आता पुढे येत आहे त्याचे सविस्तर व विश्लेषणात्मक विवेचन ह्या पुस्तकात फरीद झकेरिया ह्यांनी केले आहे. एकेकाळी अमेरिकेला नुसती शिंक आली तर सगळ्या जगाला कशी हुडहुडी भरायची, तेथपासून आता चीनची अर्थव्यवस्था कशी अमेरिकेला आव्हान देते आहे, त्याचबरोबर भारताची प्रगतीही कशी भरभराट आणते आहे व हळूहळू जगाच्या आर्थिक वजनाच्या गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू कसा आशियात सरकतो आहे हे ह्या पुस्तकात "ब्रेकिंग-न्यूज" च्या थरारात सांगितले आहे. उदा: जगातल्या मुख्य २५ कंपन्या कोणत्या असणार आहेत ते सांगताना ते सांगतात:ब्राझील, मेक्सिको, साउथ कोरिया व तैवान ह्यांच्या चार-चार कंपन्या, तीन भारताच्या, चीनच्या दोन, व प्रत्येकी एक अर्जेंटिना, चिली, मलेशिया व साउथ-आफ्रिकेतल्या. असेच नाटयपूर्ण सांगणे आहे की जगातली सगळ्यात उंच इमारत आता अमेरिकेत नसून दुबईला आहे, जगातला सर्वात मोठा मॉल चीनमध्ये, सर्वात श्रीमंत माणूस मेक्सिकन, सर्वात मोठी पब्लिक कंपनी चीनमध्ये, सर्वात मोठे विमान रशियात, तर सर्वात मोठी रिफायनरी भारतात. अर्थात हे सगळे प्रतिपादन अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, आता अमेरिकेने कसे वागावे, ह्या नीतीतून होणे साहजिकच आहे. कारण झकेरिया आता अमेरिकन नागरिक आहेत.
    झकेरियांच्या टीव्ही कार्यक्रमामुळे त्यांच्या प्रतिपादनात एक प्रकारचा मोघमपणा आलेला दिसतो, जो पांडित्यपूर्ण व सत्यशोधनाच्या दृष्टीने पुस्तकाचे चारित्र्यच बदलून टाकतो. झकेरिया भारतीय वंशाचे असल्याने भारत व चीन संबंधांबाबत त्यांनी इतिहासाची उजळणी करावी हे साहजिकच आहे. ते करीत असताना ते नेहरूंचे चीन बद्दलचे मत हे कसे वास्तवापेक्षा भावनेवर अवलंबून होते असे ते दाखवतात . सुधारित आवृत्तीत त्यावर टिप्पणी करताना ते असा उल्लेख देतात की शशी थारूर ह्यांनी त्यांच्या पुस्तकात नेहरूंनी अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघातली सेक्युरिटी कौंसिलची देऊ केलेली सीट कशी अव्हेरली ह्याचा दाखला दिलेला आहे. ह्याबाबतीत झकेरियांसारखेच एक तरुण भारतीय लेखक, श्री. ब्रह्मा छेलानी ह्यांनी त्यांच्या "द एशियन जगरनॉट" ह्या पुस्तकात नेहरूंचे सविस्तर वाभाडे काढले आहेत. त्यात नेहरूंची ही घोडचूक कशी होती हे सांगून झाल्यावर त्यांच्याच "सिलेक्टेड वर्क्स ऑफ नेहरू " ह्या ग्रंथातील खालील उतारा दिला आहे : "अमेरिकेने अनधिकृतपणे सांगितले आहे की चीनला संयुक्त राष्ट्रसंघात स्थान द्यावे, पण सेक्युरिटी कौंसिल मध्ये नाही. आणि त्याऐवजी भारताला त्याजागेवर सेक्युरिटी कौंसिलची सीट द्यावी. आम्ही हे मान्य करू शकत नाही कारण असे करण्याने आम्ही चीनपासून दुरावले जाऊ व चीन सारखा महान देश कौंसिलमध्ये नसावा हे अन्यायाचे ( अनफेअर ) होईल.". हे मत कसे नुसते भावनेवर नाही, तर दुराग्रहाचे होते हे दाखवताना छेलानी, ग्लोबल-टाईम्स ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या मुखपत्राचा ( २००९ सालच्या ६०व्या वर्धापन-दिनानिमित्ताच्या प्रकाशनात ) दाखला देऊन सांगतात की ज्या ६० विदेशी व्यक्तींमुळे चीनला फायदा झाला त्यात जवाहरलाल नेहरू आहेत, हे खुद्द त्यांची कम्युनिस्ट पार्टीच अभिमानाने सांगत आहे. त्यानंतर छेलानी नेहरूंच्या "पंचशील" चे चीनने कसे हसे उडवले त्याचा इतिहास सांगतात. राजकारणात भले एखाद्या व्यक्तीबद्दल, आदरामुळे मोघम बोलणे सोयीचे असेल, पण रोखठोक व परखड विश्लेषण करताना जर दाखले कोणाची चूक दाखवीत असतील तर ती त्यांच्या पदरात घालावीच लागते, तरच ते प्रांजळ मत म्हणता येईल. हे अर्थातच झकेरियांना परवडले नसते.
    तसेच चीन-भारत संबंधात कसे बदल होत आहेत व कसे होतील हे दाखवताना झकेरिया जपान-चीनच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भारताला कसा फायदा होतो आहे त्याचा उल्लेखही करीत नाहीत. हे त्यांच्या वैश्विक राजकारणाचे वरकरणीचे समज, दाखवणारे आहे. उदाहरणार्थ जपान-चीन ह्यांच्या संघर्षानंतर जपानने भारताबरोबरचे आर्थिक संबंध कसे सुधारले आहेत हे काही आकडयांवरून कळणारे आहे. लिप्पर ह्या रायटर्स ग्रुपच्या कंपनीने म्हटले आहे की २००५ साली जपानने भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ५०० बिलियन येन गुंतवले, जे एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढ्या विपुल प्रमाणात भरते. सखोल संशोधनांती केलेल्या लिखाणात अशी सर्वांगीणता अपेक्षित असते. त्यामानाने नुसत्या मोघम समजावर झकेरिया वाचकाची बोळवण करतात.
    मागे वळून पहात ( हिंड-साईटने) गतेतिहासाचे विश्लेषण करणे ही एक मोठीच आरामदायी बाब असते व त्यात उल्लेखनीय वेल्हाळपणा आणणे कुठल्याही पंडिताला सहजी जमण्यासारखे आहे. त्यामुळे ढोबळ घटना व त्यावर आधारित भाकिते ह्यात झकेरियांना मोहक कसब प्राप्त झालेले आहे. पण राजकीय घटना ह्या अनेक वेळा अनाकलनीय असतात. जसे रशियाची घसरण, अमेरिकेचा २००८ सालचा आर्थिक राडा, अरब राष्ट्रात पसरत चाललेली लोकशाहीची चाहूल वगैरे. अशा माहोलात माणसाच्या जीवीतात मूलगामी निकषांना महत्व येते व तेच अशा काळी कामी यावेत. जसे निरनिराळ्या प्रगत राष्ट्रात असलेले लोकांचे वैयक्तिक प्राप्तीतले असुंतलन ( इन-इक्वालिटी इंडेक्स ). संयुक्त राष्ट्रसंघाचा ह्युमन डेव्हलमेंट रिपोर्ट मध्ये एक जिनी इंडेक्स ह्यासाठी वापरतात. ० म्हणजे सगळ्यांची समान सुधारणा तर १०० म्हणजे अगदी पराकोटीची असुंतलित सुधारणा. अशा इंडेक्स मध्ये चीनचा इंडेक्स ४२ आहे. कम्युनिस्ट विचारसरणी व एकाच पक्षाची सत्ता असूनही कमाईत लोकांची इतके असुंतलन असावे हे भयावह आहे. सिंगापूर सारख्या वरवर आलबेल असलेले छोटेखानी राज्य ही ४२.५ वर आहे, तर सगळ्यात संतुलित राज्ये आहेत : डेन्मार्क ( २४.७); स्वीडन ( २५); नॉर्वे ( २५.८); फिनलॅंड ( २६.९). ह्या क्रमवारीत कुपोषणाची समस्या अजूनही भारताच्या बालकांना भेडसावत असतानाही भारतासाठी हा इंडेक्स ( ३६) चीनपेक्षा बरा असावा ह्यावरून पुढचे भाग्य कोणालाही सहज दिसावे. एकपक्षीय राजवटीत असूनही चीनमध्ये त्यांच्याच आकड्यावरून भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की एकूण १ लाख ७०हजार पार्टीच्या सभासदांवर खटले भरलेले आहेत व त्यापैकी फक्त ३ टक्के लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे. पोलादी पडद्यामागे काहीही करता येते हेच ह्यावरून दिसून येते. चीनच्या ऑलिंपिंकमध्येही हे दिसून आलेले आहे ( जसे एका छोट्या मुलीने म्हटलेले गाणे हा नुसता देखावा होता.). भव्य पूल, लांबरुंद रस्ते, टोलेजंग इमारती ह्या प्रगतीच्या खुणा भल्या आहेत पण त्यामागे केलेली दडपशाही, मध्ये येणारी घरे एका रात्रीत पाडणे वगैरे सोपे प्रकार राजवटीचा खरा चेहरा कधी ना कधी दाखवतातच. अमेरिकेत एका स्वतंत्र संस्थेने ( फंड फॉर पीस ) ह्यांनी १७७ देशांचा एक फेल्ड स्टेट इंडेक्स तयार केला आहे ज्यात कोणत्या देशात संघर्षाचे परिणाम किती खोलवर होऊ शकतात त्याची क्रमवारी दिलेली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे सगळ्या खालचा नंबर सोमालियाचा आहे तर सगळ्यात स्थिर देश नॉर्वे आहे असे आढळले. ह्या क्रमवारीत अस्थैर्यात पाकिस्तानचा क्रमांक ७वा आहे तर भारताचा ८७वा ( म्हणजे आपले स्थैर्य चांगले आहे.). ह्या क्रमवारीत चीनचा नंबर १७७ देशात ५७ वा आहे तर रशियाचा ७१ वा आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामागे ही जी मूलभूत वैषम्ये दडलेली आहेत त्यामुळे आज भले चीनचा उदो उदो होत असला तरी वैगुण्ये अनेक आहेत. तसेच पर्यावरणाला पायदळी तुडवणे, अनेक देशांची कदर न करता जगातली मोठी धरणे बांधणे हा उद्दामपणा चीनला एकना एक दिवस भोवणाराच आहे.
    अमेरिकेला आता आपले लक्ष्य आशियात करावे लागणार आहे ह्या झकेरियांच्या निष्कर्षाबाबत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही. आजच एक बातमी आली आहे की अमेरिकेचे एक अर्थशास्त्रज्ञ ( ज्यांनी २००८ सालच्या आर्थिक घसरणीचे भवितव्य वर्तवले होते), रुबीनी, हे आता भारतात त्यांची संशोधन संस्था काढत आहे. हे त्यांनी सिंगापूर, हॉंगकॉंग, व चीनचे पर्याय डावलून केले आहे त्यावरून कोणत्या देशाचे काय मोल आहे ह्याचा पडताळा येतोच. खैर आशियाचे परत एकदा चांगले दिवस आले आहेत ह्या झकेरियांच्या प्रतिपादनाबद्दल कोणालाही अभिमानच वाटेल. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे.

------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

--------------------------------------------------------------------