बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४


-----------------------------
नेमाडेपंथी वेंडी डोनिगर
----------------------------
नुकतेच साहित्यिक वर्तुळात एक वादळ उठले व शमले. डॉ. वेंडी डॉनिगर ह्या बाईंचे एक पुस्तक २००९ साली आले होते ( पेन्ग्विन इंडिया तर्फे ) "द हिंदूज: ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" नावाचे. बाईंचा हिंदू धर्माचा अभ्यास हा संस्कृत भाषेच्या अंगाने व मूलत: भाषांतरित साहित्याच्या अंगाने झालेला आहे. पण त्यांच्या हाताखाली त्यांनी हिंदू धर्माच्याच विषयात असंख्य विद्यार्थ्यांना पिएच.ड्या. दिलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत ( शिकॅगो विद्यापीठ ) त्यांचा हिंदू धर्माबाबत फार दबदबा/दादागिरी आहे. तरीही अनेक हिंदूंनी ह्या पुस्तकाला विरोध केला. कारण होते त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे. चार वर्षे कोर्टात खटला दाखल झालेला होता. तो आता फौजदारीत वर्ग होणार होता. तशात प्रकाशकांनी माघार घेत सगळी पुस्तके नष्ट करण्याचे ( स्वखर्चाने पुस्तके लोकांकडून परत घेऊन त्याचा लगदा करण्याचे ) मान्य करीत कोर्टाबाहेर समझौता केला. कोण आहेत ह्या वेंडी डॉनिगर व असे काय होते ह्या पुस्तकात ?
आपल्या राज्यघटनेत ज्या विद्यापीठांना अनुदान ( सरकारी मदत/पैसा ) मिळते तिथे एखाद्या धर्माचा विषय शिकवायला कायद्याने बंदी आहे. आपण निधर्मी ( सेक्युलर ) असल्याने असा नियम आहे. ( आता मदरशांत इस्लामचे शिक्षण कसे देतात हा प्रश्न अजून आलेला नाही.). त्यामुळे आपल्याकडच्या विद्यापीठात धर्माबाबत एम.ए. वा पिएच.डी असे अभ्यासक्रम असत नाहीत. पण अमेरिकेत असे नसल्याने की काय शिकॅगो विद्यापीठात "एशीयन रिलीजन्स" असे विद्यासन आहे व त्याच्या प्रमुख आहेत ह्या वेंडी बाई. त्या एका प्रकाशकाच्या कन्या होत्या व त्यांची आजपर्यंत १६ पुस्तके ( जाड बाडे ) प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातली गाजलेली आहेत, कामसूत्रावर, व रुग्वेदावर. ह्या बाईंना संस्कृत येते ( म्हणून त्या फिलॉलॉजिस्ट ) व त्या अनुषंगाने त्या हिंदू धर्माबाबत लिहीत असतात. (नेमाडेही फिलॉलॉजिस्ट, त्यांचा शिकायचा विषय इंग्रजी तर शिकवण्याचा इंग्रजी, मराठी होता व हिंदू ही एका धर्मावरची कादंबरी आहे, हे सारखेपण मोठे मनोहारी आहे. ).  त्यांची एकूण शैली ही सायकोऍनालिसिसची असून हिंदू धर्मातल्या सेक्स बद्दल त्या नेहमी लिहीत असतात. वरील पुस्तक त्यांचे २००९ साली प्रसिद्ध झाल्यावर त्यावर अनेक हिंदूंनी विरोध दर्शवला ( त्यात प्रमुख आहेत एक राजीव मलहोत्रा नामक उद्योगपती ) व दिल्लीला शिक्षा बचाव आंदोलन समीतीने चार वर्षांपूर्वीच ह्या पुस्तकाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या ह्या मुद्यावरून सिव्हिल खटला दाखल केला. त्यावर कालच पेन्ग्विन इंडिया ह्या त्यांच्या प्रकाशकांनी सपशेल माघार घेत समझोता केला आहे. खरे तर, विचार स्वातंत्र्याच्या कलमाखाली कोणत्याही पुस्तकावर बंदी येणे हे चांगले नाही, पण त्या आड जर एखाद्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर मग नाईलाज होतो. हे आपण चित्रकार हुसेन ह्यांच्या चित्रांविरुद्ध केलेल्या खटल्यांदरम्यान पाहिलेच आहे. चित्रकाराला कसेही चित्र काढायची परवानगी असतेच, पण त्याने नेमक्या हिंदू देवतेचे ( सरस्वतीचे ) नागडे चित्र काढले तर साहजिकच हिंदूंच्या भावना दुखावल्याने, त्याला विचार-स्वातंत्र्याचा टेकू मिळू नये असेच कायदा सांगतो. तसेच काहीसे इथे घडले असावे, नसता पेन्ग्विन सारखी मातब्बर कंपनी अशी पुस्तक मागे घ्यायला तयार झाली नसती.
मला ह्या पुस्तकाचा माग बडोद्याच्या दादूमियां ह्यांच्या फोनमुळे लागला. ( महिनाभरापूर्वी ) मी त्यांच्याशी बोलत असताना नेमाडेंचा विषय निघताच त्यांनी ह्या पुस्तकाविषयी सांगितले व ते नेमाडे ह्यांच्याशी त्याबाबत बोलले होते हेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दहा पंधरा दिवसांनी मला हे पुस्तक मिळाले व त्याच्या वाचनानंतर आता ही बातमी ( हे पुस्तक मागे घेतल्याची ) आली. त्यामुळे ह्या पुस्तकाचा परामर्श घेणे क्रमप्राप्त झाले. शिवाय हे पुस्तक, त्याची लेखिका व नेमाडे ह्यांची शैली व वृत्ती ही साम्यस्थळे ह्या अभ्यासात प्रखरतेने जाणवली व साहित्य जगतात हे एक धोक्याचेच वळण असल्याने त्याचा इथे परामर्श घेण्याचे योजले आहे.
"द हिंदूज : ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" ह्या पुस्तकाची लेखिका डॉ.वेंडी डॉनिगर ह्या विदुषी अगदी नेमाडेपंथी वळणाच्या आहेत. नेमाडेंना जशी इतिहास लेखनाची शिस्त पाळणे नको असते, पण इतिहासाला आपल्या कलाप्रमाणे वळवणे हवे असते, तसेच ह्या बाईंचे आहे. नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे नाव "हिंदू : एक समृद्ध अडगळ" तर ह्या बाईंच्या पुस्तकाचे शीर्षक "द हिंदूज : ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" असे आहे. म्हणजे उपशीर्षकही समान अर्थाचेच आहे. नेमाडेंची म्हणायला कादंबरी आहे पण ती आत्मचरित्रपर असल्याने ती प्रत्यक्ष हकीकतीच सांगणारी आहे, तर ह्या बाईंचे पुस्तक हे अधिकृत रित्या नॉन-फिक्शन असले तरी ते त्यांचे लांबलचक स्वगतच आहे. दोन्हीही पुस्तके काही "इतिहास" नाहीत. दोघेही इतिहासाची शिस्त पाळीत नाहीत व दोघेही तेव्हढेच इतर इतिहासकारांबद्दल  आक्रमक आहेत. जसे हिंदू कादंबरीच्या प्रमोशनच्या मुलाखतीत नेमाडे म्हणतात की इतिहासकार राजवाडे हा मोठा धूर्त ब्राह्मण होता. त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळून टाकली व त्यांनीच आपल्या ओव्या ह्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणून ह्या प्रतीत घुसवल्या असाव्यात. नेमाडेंना स्वत: इतिहासाच्या ज्ञानशाखेचे गम्य नाही व त्या शाखेची शिस्त तर अजिबात नाही. पण इतिहासात ढवळाढवळ मात्र त्यांना संभाजी ब्रिगेडच्या तोडीचीच करायची आहे. ह्या वेंडी डॉनिगर बाई ह्या प्रोफेसर आहेत "एशिअन धर्म" विषयाच्या पण त्या नेमाडेपंथी वळणाने हिंदूंच्या "इतिहासा"ला त्यांना पाहिजे तशी कलाटणी देऊ इच्छितात.
दुसर्‍या धर्माची चिकित्सा आपण करू नये असे काही बंधन नाही. पण चिकित्सेत व चेष्टेत निश्चितच फरक ठेवायला हवा. ह्या वेंडी बाईंनी जी निरिक्षणे केली आहेत ती काही खोटी आहेत असे नाही पण ती चेष्टा करण्याच्या मिषाने वा वाकुल्या दाखवण्याच्या प्रकारच्या आहेत. ती काही शास्त्रीय चिकित्सा म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ त्यांनी पुस्तकात पेरलेली ही निरिक्षणे पहा : वेंडी डॉनिगर बाई ह्या पुस्तकात ठिकठिकाणी हिंदू धर्माला आवडणार नाही अशा गोष्टी मोठ्या त्वेषाने सांगतात. त्यातल्या काही अशा : १) गीता हे पुस्तक अहिंसा नव्हे तर हिंसा कशी करावी ते सांगते. २) कृष्ण हा देव मारामार्‍या कशा कराव्यात युद्धे कशी करावीत ते सांगतो व गीतेत त्याचे समर्थन देतो. ३) पूर्वी सगळी ब्राह्मण मंडळी गाईचे मास खात असत. ४) स्वामी विवेकानंद हे गोमांस भक्षण करण्यास प्रोत्साहन देत असत. ५) विवेकानंद हे समलिंगि-संभोग करणारे होते ६) रामकृष्ण परमहंस हे समलिंगी संभोग करणारे होते. ७) गांधीजी त्यांच्या मुलीच्या वयाच्या तरुण मुलींसोबत नागडे झोपत असत. ८) हिंदू लोक हे अजिबात सहिष्णू नव्हते. ९) हिंदू लोकात स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नाही व त्या केवळ वासनेसाठी मानल्या जातात. १०) रामाबरोबर कायम राहणार्‍या लक्ष्मणाला सीतेबद्दल सुप्त आकर्षण वाटत असते. ( आता हे ह्या बाईंना कसे कळले ? ). ११) हिंदू धर्म हा कुठल्याही मूलभूत तत्वावर आधारलेला नसून काही थातुरमातुर चालीरीतीतून तो उभा राहिलेला आहे.  ह्या कुठल्याही प्रतिपादनाला काहीही शास्त्राधार वा पुरावा लेखिका देत नाही तर हे ठाम वैयक्तिक मत म्हणून दडपून सांगते. एकेकाळी रामकृष्ण परमहंस म्हणे इस्लामची चिकित्सा करू इच्छित होते तेव्हा त्या आधी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, स्वत: मुस्लिम झाले व त्या भावनेने इस्लामकडे पाहात त्यांनी अभ्यास केला. हे खरे खोटे करण्यापेक्षा  धर्मशरण प्रवृत्तीने नेहमीच धर्मचिकित्सा संभवनीय असणार नाही हे आपण मानू शकतो. पण निदान ती चिकित्सा कोणताही कटू पूर्वग्रह न बाळगता करावी हे तर कोणीही मान्य करील. ह्या वेंडी डॉनीगर बाईंना हे पथ्य पाळणे जमलेले नाही हे त्यांच्या काही पुस्तकांच्या शीर्षकांकडे पाहिले तरी लक्षात येईल. जसे त्यांचे एक पुस्तक आहे "द ओरिजिन ऑफ इव्हिल इन हिंदू मायथॉलॉजी". दुसरे एक पुस्तक आहे "बेडट्रिक" नावाचे, ज्यात सर्व काही पलंगावरल्या करामतीच असतात असे सेक्सची व्याप्ती दाखवणारे कथन आहे. मुळात इव्हिल आणि गुड ( चांगले आणि वाईट ) ह्यांच्या कायमच्या लढाईत जगातले अनेक धर्म, अनेक लोकांबरोबर जखडल्या जातात हे खरे असले तरी एखाद्या पाहणीत आढळलेले इव्हिल ( वाईट ) हे काही कायमचेच वाईट असत नाही हे कोणाही धर्माच्या चालीरीतींचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. सतीची चाल, केशवपन, विधवा-विवाह-बंदी ह्या काही हिंदू धर्मातल्या चांगल्या चालीरीती निश्चितच नव्हत्या पण त्या कालांतराने हिंदूंनीच मोडल्या व धर्मावर आलेले सांवट दूर केले. असेच सगळ्या धर्मात चालीरीतींची उत्क्रांती होत होतच रीती उत्पन्न होतात व लयास जातात. हे जणु काही एखाद्या सजीव जीवाच्या जीवनात घडते ( उत्क्रांतीत काही वाईट गोष्टी गळून पडतात तसे ) तसेच धर्म ह्या संस्थेतही घडत असते. चिकित्सा करणार्‍याने त्याच्या समजुतीनुसार चांगले वाईट हयाचा निवाडा करायचा असतो. त्यात अभिनिवेष आणून काही साधत नसते. इथेच वेंडी बाईंची फसगत होते.
शैली व मांडणीमागची भूमिका ह्याबाबतीत नेमाडे व ह्या बाईंचे खूपच सारखेपण आहे. ह्या बाई हिंदू धर्म व त्याच्या इतिहासाकडे मानसोपचार तज्ज्ञाच्या दृष्टीने पाहतात. सायको-ऍनालिसिस च्या तंत्राने त्या धर्माचे व इतिहासाचे विश्लेषण करतात. शिवाय सबंध पुस्तक त्या संवादाच्या शैलीच्या अंगाने लिहितात. वाचकाला स्वत:ची मते सुनावतात व पटवतात. त्यातून हा पहा असाच इतिहास होता असे त्यांना सिद्ध करायचे आहे. नेमाडेही अशाच वळणाने कादंबरीत आपली मते पेरीत जातात. उदाहरणार्थ हिंदू कादंबरीतले ज्ञानेश्वरांचे हे प्रकरण पहा : "हिंदू"त जातीयते मुळे जातीजातींचा एकमेकावरचा दाब कसा उफाळून येतो हे दाखवणारा खास नेमाडपंथी वळणाचा एक किस्सा ( पृ.१५६) दिलाय. तो असा : "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. " इथे केवळ कादंबरीतले एखादे पात्र हा प्रमाद करीत नसून लेखक त्याचा अर्थ आपल्याला मानसशास्त्रांच्या आडवळणाने आपल्याला समजून सांगत आहे. ज्ञानेश्वरीत खरेच अशा ओव्या आहेत काय ? ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा, तर "दाब वर येणे" दिसणे शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना"!. त्यात महानुभावी पंथाचे नेमाडे वा नायक खंडेराव व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . असा अर्थ काढून दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. शिवाय ज्या अकादेमीच्या मानसन्मानासाठी कादंबरीचा आटापिटा आहे, तिच्या सौंदर्यात काडीचीही अशा कलागतींनी भर पडत नाही.
ह्याच पार्श्वभूमीवर डॉ.आनंद यादव ह्यांचे तुकारामवरच्या पुस्तकाचे प्रकरण आठवून पहा. इथे डॉ.यादव हे स्वत: तुकाराम भक्त. पण अनवधानाने कादंबरीकरण करताना तरुण तुकाराम दुकानात आलेल्या मुलींना गोळ्या ( चॉकलेट ) देता देता हाताने स्पर्शतो असे लिहिल्याने वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या व यादवांना पुस्तकच काय संमेलनाचे अध्यक्षपदही गमवावे लागले. कामभावना ही  सर्वव्यापी असते व त्यातून देवांचीही सुटका नसते हे जरी वैश्विक सत्य असले तरी देवांनी अशा भावनेला बळी पडल्याचे कोणत्या धर्मानुयायाला आवडेल ? त्यात देवावरची श्रद्धा असण्याबरोबरच , मानवी कमजोरींवर देवाने मिळवलेला विजय ह्या आदर्शाचेच आपण कौतुक करीत असतो. वेंडी बाई जेव्हा रामाबरोबर असलेल्या लक्ष्मणाला सीतेबद्दल लैंगिक आकर्षण वाटते असे म्हणतात तेव्हा त्याचा शास्त्राधाराने पुरावा देण्यापेक्षा ही एक चेष्टा करण्याचाच प्रकार होतो. कारण ह्या निरिक्षणातून हिंदू धर्माची अवहेलना करण्याचाच मानस दिसतो.
असल्याच सायको-ऍनालिसिस पद्धतीने वेंडी डॉनिगर ह्या बाई त्यांच्या पुस्तकात आपल्याला रामकृष्ण परमहंस ह्यांच्या बद्दल सांगतात. ते सांगताना त्या म्हणतात की रामकृष्ण परमहंस हे होमोसेक्स्युअल होते व त्यात ते शिष्यांचा उपयोग करून घेत. आणि ह्याच्या समर्थनात त्या विवेकानंदांनाही ओढतात. हे ऐतिहासिक सत्य म्हणून दडपून सांगताना त्या आपल्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा आधार घेतात. शिष्यांशी केलेले स्पर्श वाचून ती वागणूक समलिंगी माणसांची आहे असे ठासून देतात. आज अमेरिकेत भले होमोसेक्युअलिटी हा वंद्य प्रकार असेल पण हिंदूंना कुठल्याही ऐतिहासिक पुराव्याअभावी त्यांचे एक वंदनीय संत असे होमोसेक्स्युअल होते अशी बदनामीकारक माहीती स्वत:च्या सायको-ऍनालिसिसच्या सहाय्याने दणाकावून द्यायची ही पद्धत वर दिलेल्या नेमाडे ह्यांच्या वळणाचीच आहे. बरे दोघेही काही सायकिअट्रिस्ट नाहीत वा त्या विषयाच्या शिस्तीतून ते हे निवेदन करीत नाहीत तर शिळोप्याच्या गोष्टीसारखे ठोकून देत आहेत.
ह्या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आहेत भैरप्पा त्यांचे सायकोऍनालिसिसचे कसब पहा.  ब्राह्मणांविरुद्ध दाब वर येण्याचा, भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मधला, ( पृ.२२६) हा संवाद पहा. कथेची नायिका असलेल्या सत्या चा भाऊ ( जो ब्राह्मण व पुजारी असतो ) तो निवडणुकात ब्राह्मण-विरोधात कसा प्रचार करतात ते सांगताना म्हणतो: "हजारो वर्ष घरात बसून ब्राह्मणांच्या बायकांनी आपली कातडी गोरी करून घेतली आहे, आमच्या बायका उन्हातान्हात शेतात राबून काळ्या झाल्या आहेत. त्या बिचार्‍या बामणांची घरची खरकटी भांडी घासत होत्या. माझ्या हातात आणखी दहा वर्ष सत्ता येऊ दे. बामणांच्या बायकांना आमच्या घरचे केरवारे करून खरकटी भांडी घासायला लावतो, आमच्या शेतांवर उन्हा-तान्हात राबायला लावतो--". आता भैरप्पांच्या कादंबरीचा मूळ रोख, प्रत्येक जात ब्राह्मणासारखे वागायचे प्रयत्न करते, असा वेगळाच असला तरी ब्राह्मण-विरोधाचा प्रसंग वर्णन करताना इथे पहा ते कसे सांगोपांग तर्क देत आहेत. असलेच तर हे खरे "दाब वर येणे " म्हणता येईल. ह्याला फ्राइडचा वरदहस्त नको किंवा ओढून ताणून ज्ञानेश्वरांचे विडंबन करायला नको. शिवाय सगळे कसे सभ्यतेत बसणारे आहे. बरे ह्या कादंबरीला खुद्द साहित्य अकादेमीनेच पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ती तुल्यबळ आहेच. भले नेमाडे आता शिकण्यापल्याड असतील पण नवशिक्या कादंबरीकारांना, एखादे विद्रोहाचे कसे वर्णन करावे, व समर्थनाचा पाया कसा मजबूत असावा, त्याचा हा आदर्श असा वस्तुपाठच आहे. आणि तो वेंडी बाईंनीही पाळण्यायोग्य आहे.
प्रस्तुत "द हिंदूज" हे पुस्तक लिहायच्या आधी वेंडी बाईंनी कामसूत्रावर सुधीर काकरासोबत एक मोठ्ठे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे व सायको-ऍनालिसिसची एकदा कास धरलेली असल्यामुळे की काय बाईंच्या सर्वच विवेचनात कामुकतेचे ( सेक्सुअलिटीचे ) प्रचंड स्तोम माजते. त्या हिंदू धर्मात सगळीकडे लिंगाची पूजा कशी चालते ते दाखवत सगळ्या धार्मिक विचारात कामुकता कशी व्यापून आहे, असे आपले मत दडपून सांगतात. आता ह्याला त्या काही शास्त्राधार देत नाहीत तर जे प्रत्यक्ष दिसणारी प्रतीके आहेत ( जसे शिवलिंग वगैरे ) त्यावरून सायकोऍनालिसिसने हे सांगत आहेत. हे हिंदूंना कसे पटावे ?
असेच काहीसे नेमाडेही हिंदू मध्ये करतात. जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे ह्या एकाच निकषावर, खरे तर, कोणाही लेखकाची स्त्रीवादाकडे पाहण्याची व तसे चित्रण करण्याची जबाबदारी खूपच वाढते. पण नेमाडेंच्या कादंबरीत स्त्री-पात्रे अगदी वावडे असल्यासारखी, मख्खपणे, वावरतात. एकवेळ नायक खंडेराव लग्न करीत नाही, हा आपण समर्थांचा प्रभाव म्हणून सोडून देऊ.( समर्थांची ते टिंगल-टवाळी करीत असले तरी !) पण कथानकात प्रभाव पाडणारे स्त्रीपात्र नसावे हे "कास्टिंग कौच" चे गौडबंगाल अनाकलनीय आहे. त्यात भर म्हणजे कथानकात जी पात्रे भरपूर पाने व्यापून राहिली आहेत ती आहेत, कामोत्तेजित करणार्‍या "लभान्या" ( किंवा लमाणी स्त्रिया ), गावातल्या झेंडी, बनी रांड वगैरे नावाच्या वेश्या. ह्यांना करून करून किती उदात्त करणार ? दुसर्‍या आहेत, नात्यातल्या आत्या, आजी वगैरे स्त्रिया, ज्यांची हयात व कर्तबगारी घरकाम व रगाडयातच जाते. त्यातल्या आत्या हे पात्र लग्नानंतर लगेच माघारी येते, घरात अडगळीला राहून राब-राब राबते व इतके करून इस्टेटीत तिला वाटा देत नाहीत. नायक खंडेराव ह्याबाबत खंत बाळगतो पण त्याचे परिमार्जन काही करत नाही. अर्थात नायकाने कसे वागावे हा सर्वस्वी लेखकाच्या अखत्यारीतला प्रश्न असला तरी नेमाडे हे निश्चित नैतिक भूमिकेचे श्रेय मिरवणारे असल्याने नायकही तसे वागेल असे वाटत होते. तशात ही आत्मचरित्रपर कादंबरी असल्याने लेखक व नायक हे एकच आहेत असे समजण्यास वाव राहतो. गंमत म्हणजे ते आवर्जून वडिलांनी त्यांच्या डोळ्याच्या इजा (लहानपणी ) होण्यावर घेतलेली काळजी छान रंगवतात पण त्याच जोडीला आईचे काही सांगत नाहीत. ( आणि तरीही त्यांना साने गुरुजींबद्दल, श्यामच्या आईबद्दल, आदर आहे !). कथेत नायक म्हातारा झाल्यावर त्याचा मुलगा त्याला दहिसरला रहा म्हणतो, गावी येत नाही, असे वर्णन येते ( म्हणजे यथावकाश नायकाने लग्न केलेच असणार ). पण ते आपल्या पत्नीचे, नायकाच्या आईचे एक अवाक्षरही काढीत नाहीत. हे एक प्रकारचे स्त्री-तुसडेपण कादंबरीभर मिरवण्याचे प्रयोजन मात्र दिसत नाही, शोभत तर नाहीच. इतके असूनही रीतीप्रमाणे ("पोलिटिकली करेक्ट") असण्याचा धाक/रेटा असा आहे की स्त्रीवादाचे सेमिनार ते कथेत दाखवतात, त्यानिमित्ताने समर्थ रामदास काय किंवा गौतम बुद्ध काय ह्यांची टवाळी करतात. तसेच काही काही आवश्यक कल्पना, रम्यपणे, पण न फुलवता, नुसत्या उदघोषित करतात. जसे : "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे की जीवशास्त्रीय ?" असा एक सवाल ते वाचकांना टाकून जातात. एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याने परिक्षेत प्रश्न सोडवल्या-(अटेंप्ट)-केल्यासारखा, काठावर (पासिंग) मार्क मिळवण्यासारखा हा यत्न राहतो ! पण सेक्स्युअलिटी दाखविण्याचा जो खपाचा भरवसा देणारा प्रकार असतो त्याच्यासाठी नेमाडे "तसले" प्रकार हमखास योजतात, ते असे :
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
खळबळजनक मसाला टाकला की पुस्तक बेस्ट-सेलर सहजी होते हा होरा प्रत्येक लेखकाला प्रकाशाला असतो व थोड्याफार प्रमाणात लोक हा प्रकार सर्रास वापरात. पण हे करीत असताना एक पथ्य असे पाळावे लागते की जी सर्वमान्य व्यक्ती आहे त्याबाबत शक्यतो हे प्रकार टाळावेत. कारण त्याने एखाद्या समाजाच्या भावना दुखू शकतात. उदाहरण म्हणून दाखवायचे तर ह्या वेंडी बाई त्यांच्या पुस्तकात महात्मा गांधी हे कसे तरुण स्त्रियांसोबत नागडे झोपत असत व ते तंत्रशास्त्राच्या आधारे स्वत:च्या कामुकतेवर विजय मिळवण्यासाठी कसे असे असा मसाला देतात. महात्मा गांधीवर आज इतिहासाने कितीही अन्याय केलेला असला तरी वैयक्तिक चारित्र्याबाबत शंका घेण्यासारखे ह्या माणसाच्या जीवनात काही नव्हते असेच हिंदूंना वाटते. भले एका हिंदूनेच त्यांचा खून केलेला असला तरी तमाम हिंदूंच्या लेखी महात्मा गांधींचे चरित्र धुतल्या तांदळासारखे होते हीच भावना आहे. ती तुम्ही असे किस्से इतिहासाच्या नावाने घुसवून त्यांच्या भावना दुखवू शकत नाही. कॉंग्रेसकडे सध्या वैचारिक दारिद्रय असल्याने एका हिंदुत्ववादी ग्रुपलाच ह्यासंबंधी तक्रार करावी वाटली व हे प्रकरण कोर्टात गेले. तरी पण इतिहास सांगण्याच्या मिषाने अशा भाकडकथा रंगवीत सर्वमान्य लोकांच्या बदनाम्या कराव्यात हे धोरण निश्चितच वैचारिक बाटलेपण दाखविणारे आहे. वेंडी बाईंनी अशा बदनाम्या करायला नको होत्या.
नेमाडेही बाईंच्या पावलावर पाय ठेवून महात्मा गांधींचा निष्कारण असा पाणउतारा करतात. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ? पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा : "शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..." साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण बहुतेकांच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेशी फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी काही लेवा पाटिलांच्या विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य ! महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते. महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला आता नेमाडे मोकळे आहेत ! नेमाडे केवळ महात्मा गांधींचाच अपमान करून थांबत नाहीत, तर संत रामदास, गौतम बुद्ध ह्यांचीही ते निंदा करतात ती अशी :  पृ.४५० वर पहा: "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..." असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी. पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय व नेमाडे बायकोला सोडून गेले, त्यांचा अमेरिकेतला मुलगा त्यांना विचारेनासा झाला तर ती आत्मनिष्ठा व गौरव करणारी बाब ? हा न्याय खासा नेमाडेपंथी असला तरी धिक्कार करण्या योग्यच ! ब्राह्मणांनी व बुद्ध धर्मीयांनी. नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे व मग आपण त्यांना मानू . तूर्त धिक्कारूच !
एकदा का टिंगल टवाळी करणे म्हणजेच चिकित्सा असा लेखकाचा/लेखिकेचा ग्रह झाला की मग समीक्षा व टिंगल ह्यातला फरक अस्पष्ट होतो हे आपण नेमाडेंच्या "टीकास्वयंवर" मधल्या त्यांनी मराठीतल्या तमाम साहित्यिकांवर झाडलेल्या दुगाण्या पाहिल्या की सहजी लक्षात येते. ही टिंगल करायची सवय मग लेखकाला इतकी धीट बनवते की ज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंनी घेतला त्याच कुसुमाग्रजांना त्यांनी त्यांच्या "बिढार" कादंबरीत कसे नीच पातळीवर नेऊन ठेवले होते हे ही तो लेखक विसरतो. जसे: बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." हे उदाहरण ह्या साठी लागू आहे की ह्या वेंडी डॉनीगर बाईंना आंतरराष्ट्रीय नव्हे तर भारतातही रामनाथ गोएंका ऍवॉर्ड मिळालेले आहे व तरीही ह्या टिंगल टवालीच्या स्वभावामुळे त्या चिकित्सेऐवजी हिंदू धर्माची अवहेलनाच करतात.
असेच काहीसे नेमाडेही हिंदू पुस्तकात व त्यानिमित्तच्या प्रमोशनमधून प्रसृत करतात की ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला. हिंदू धर्मात असंख्य परंपरांची समृद्ध अडगळ जमा झालेली आहे, वगैरे. अमेझॉन.कॉम वर वेंडी बाईंच्या ह्या पुस्तकावर टिप्प्णी करताना एका वाचकाने मोठा मार्मिक अभिप्राय दिला आहे. तो म्हणतो "द हिंदूज" ह्या डॉनिगर बाईंच्या पुस्तकात "क्षुल्लकपणाची समृद्धी आहे" ( Abundance of pettiness " ). नेमाडेंनी तर त्यांच्या शीर्षकातच "समृद्ध अडगळ" नमूद केलेली आहे.  नेमाडे हे नमूद करताना काही शास्त्राधार वा शास्त्रचर्चा करीत नाहीत. वरील साम्यस्थळे पाहिल्यावर वेंडी डॉनिगर ह्या बाई अमेरिकेतल्या नेमाडेपंथी लेखिकाच आहेत व त्यांच्या पुस्तकावर माघार घ्यायची वेळ आली ते बरेच आहे असे कोणाही वाचकाला वाटेल व अशीच वेळ नेमाडेंच्या हिंदूवर येवो अशी तो अपेक्षा करील !
--------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२
-------------------------------