मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल----

"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )"
लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा
पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"
    आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे.
    पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत.
    कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो.
    हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच.
    ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते.
    ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे.
    हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत.

--------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------


वाचाल तर वाचाल---१०
"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )" लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"

आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे. पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत. कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो. हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच. ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते. ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे. हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत. --------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------------------------

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल---९

-------------------
"स्टीव्ह जॉब्स" ले: वाल्टेर आयझॅक्सन
सिमोन ऍंड शुस्टर प्रकाशन, पाने ६००, किंमत र ७९९ ( फ्लिपकार्ट: र ५६०)
-------------------------------
आयझॅक्सनचा स्टीव्हला ई-मान
------------------------------------------
वाल्टेर आयझॅक्सन ही फार थोर असामी आहे. ते सीएनएन चे सर्वेसर्वा होते. तसेच सध्या एस्पेन संस्थेचे मुख्य आहेत. ( ही संस्था जगातल्या विद्वानांची शोध-संस्था आहे ). ह्यांनी आत्तापावेतो आइनस्टाइन, बेंजामिन फ्रॅंकलिन व हेन्‌री किसिंजर ह्यांची चरित्रे लिहिली आहेत. आयझॅक्सन ह्यांनी स्टीव्ह जॉब्सचे चरित्र लिहावे ह्यातच स्टीव्हचा मोठेपणा सिद्ध व्हावा इतका ह्या लेखकाचा दबदबा आहे. लेखक कबूलच करतो की चरित्र लिहिण्याचा लकडा स्टीव्ह जॉब्सनेच त्याच्यामागे लावला होता. पण त्याचबरोबर लेखक हेही सांगतो की त्याने एका अक्षरानेही पुस्तकात बदल केला नाही की काही दबाव आणला नाही. ( फक्त मरताना पुस्तकावरचे चित्र जरा त्याच्या इच्छेप्रमाणे बदलले तेव्हढेच.). ह्या लेखकाचा असा बोलबाला आहे की हे प्रत्यक्ष प्रमाण पाहूनच लिहितात. त्यामुळे स्टीव्ह जॉब्सच्या नाना आख्यायिकांना ह्या पुस्तकात फाटा मिळतो व जे पुराव्यावरून, मुलाखतीतून सिद्ध झाले तेच ह्यात उतरले आहे.
स्टीव्ह जॉब्स हा नाना विसंगतींचा मेळ असलेला गृहस्थ होता. ह्याचे सर्वच अगदी टोकाचे असे. यश मिळाले तेही इतक्या टोकाचे की अजून कित्येक दशके त्याचे नाव संगणक क्षेत्रात मानानेच घेतल्या जाईल. त्याच्या ऍपल कंपनीत सध्या जी रोख शिल्लक आहे ती सबंध अमेरिका देशाची सध्याची तूट भरून काढील इतकी प्रचंड आहे. स्वत:च्या कंपनीतून ज्याला कंपनीने काढून टाकले त्यानेच दहा वर्षानंतर ह्या कंपनीला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविले. ज्याने एवढे प्रचंड यश कमावले तो वृत्तीने इतका अपरिग्रह करणारा होता की त्याने आपले स्वत:चे घर कैक वर्षे बिना-फर्निचर ठेवले होते व कंपनीचा मुख्याधिकारी म्हणून तो केवळ एक डॉलर वार्षिक पगार घेई. भारतात येऊन त्याने बौद्ध धर्माचा प्रभाव स्वीकारला होता व त्याचविरुद्ध तो राजरोसपणे ड्रग्जही घेत असे. फुकट मिळते म्हणून मंदिरातून त्याने जेवणही घेतलेले आहे. व्यक्तिगत जीवन तर त्याचे इतके नाट्यमय घटनांनी भरलेले होते की त्यावर सहजी कित्येक कादंबर्‍या लिहाव्यात. वयाच्या २७ व्या वर्षी त्याला आपण दत्तक घेतल्या गेलेलो आहेत ते कळते व मग तो खर्‍या आई-वडिलांचा शोध घेतो व तितक्याच निष्ठेने दत्तक आईवडिलांचे ऋण मानतो.त्याच्या मैत्रिणीही पाचसहा असतात. त्यापैकी एकीकडून त्याला वयाच्या २३ व्या वर्षी एक मुलगी होते, पण तिला तो नाकारतो. कारण त्याच्या मैत्रिणीचे इतरांशीही संबंध असतात. जेव्हा कौंटी तिच्यातर्फे त्याच्यावर खटला भरते तेव्हा तो तिची सोय करतो व केवळ नवीन वैज्ञानिक चाचणी आली आहे म्हणून डिएनए टेस्ट करून घेतो.( इथे अमेरिकेतल्या कौंटींचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे). पितृत्व सिद्ध झाल्यावर मुलीचा तो स्वीकार करतो, एवढेच नाही तर पुढे चालून नवा संगणक करतो त्याचे नावही मुलीचे ( लिसा ) ठेवतो. तिची काळजी घेतो. स्वत: अतिशय प्रामाणिकपणे निरंहकारी, विनयशील जीवनशैली स्वीकारत व्हेजिटेरियन राहतो, उपास तापास करतो त्याच भरात प्रचंड पैसेही कमावतो. स्वत: शिक्षण अर्धवट सोडूनही स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना भाषण देताना एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिच्याशी लग्नही करतो. एखाद्या रोमॅंटिक सिनेमात शोभावे असे हे जीवन. एरव्ही मृदू असणारा हा स्टीव्ह जॉब्स एखाद्या विषयासंबंधी टीका करताना अजिबात दयामाया न ठेवता वाभाडे काढीत असे व कठोर टीका करताना शिव्याही घालीत असे.
बुद्धीच्या हुशारपणाचे मोजमाप करणे हे भारीच जोखमीचे काम असते. ते करताना पारंपारिक रीत म्हणून आपण शैक्षणिक हुशारीलाच महत्व देतो पण संगणक क्षेत्रात जेव्हढे पुस्तकी पढीक आहेत त्यापेक्षा ज्यास्त शिक्षण सोडलेले लोक दिसून येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्‌, फेसबुकचे झुकरबर्ग, ओरॅकलचे लॅरी एलिसन व ऍपलचे स्टीव्ह जॉब्स ह्यांच्यात हुशार कोण हे ठरवणे फारच अवघड आहे. बरे यशस्वी कोण झाले ह्यावरून हुशारी ठरवावी तर सगळेच प्रचंड यशस्वी झालेले आहेत. नवनवीन उत्पादनांचे पेटंटस्‌ ज्याच्या नावावर अधिक त्यावरून हुशारी जोखायची तर ह्याबाबतही सगळे तुल्यबळच म्हणावे लागतील. पण स्वत:ला कॅन्सर झालेला असताना, व हा विषय वैद्यकीय ज्ञानाचा, नवखा, असताना स्टीव्ह जॉब्स त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची जी मीटींग घेऊन उपचाराचे दिशादिग्दर्शन करतो व त्याचे समर्थन देतो ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या लांब पल्ल्याची चुणूक दाखविणारे आहे. त्यात कॅंसरवर तो मात करू शकत नाही व त्यातच त्याचा दु:खद शेवट होतो ही एक मोठीच शोकांतिका ठरते.
सृजनाच्या क्षेत्रात हटके विचार करण्याचे इतके अप्रूप आहे की सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करणे ( आउट ऑफ द बॉक्स ) हे अपार मोलाचे ठरते. आजकाल व्यवस्थापन शास्त्रातही ह्याला महत्व आले आहे. त्यामुळेच स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे, सतत नवनवीन उत्पादने शोधून काढणे, ती फटाफट नेमून दिलेल्या वेळेत बाजारात आणणे आणि बाजाराने त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देणे ह्या योगायोगामागे केवळ काही दैवी असण्यापेक्षा त्याच्या यशाचे काही गमक असणारी रीत असावी असे वाटणे साहजिक आहे. एकेकाळी संगणक क्षेत्रात सगळे नेमून दिलेल्या रीतीने करण्याची, कॅटलॉगप्रमाणे उत्पादने वापरण्याची परंपराच निर्माण झालेली होती. पण स्टीव्ह जॉब्सने ह्याविरुद्ध गोष्टी इतक्या सोप्या व सहज करण्याचा हातखंडा बांधला की ह्याची आयपॉड, आयफोन व आयपॅड ही उत्पादने विना-कॅटलॉग कोणीही वापरू शकतो. केवळ जादू सारखे हे कसब ऍपल कंपनीची ही उत्पादने आपल्याला दाखवतात तेव्हा थक्क व्हायला होते. माझा आठ वर्षांचा अमेरिकेतला नातू पहिल्यांदाच आयपॅड हातात घेऊन जेव्हा मला सांगू लागतो की आजोबा, हे बघा इथे जर एखादा शब्द आपल्याला अवघड असला तर त्यावर फक्त बोट ठेवा व लगेच ते डिक्शनरीमधला त्याचा अर्थ आपल्याला सांगते, तेव्हा स्टीव्ह जॉब्सच्या अपार कल्पकतेची चुणूक दिसून येऊन दिपायला होते. आणि हे सार्‍या जगाला दिपवणे, ऍपलची ही उत्पादने अजून कैक वर्षे करीत राहणार आहेत. सृजनाच्या ह्या यशाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. व ह्या यशामुळे त्याच्या अमानुष वागण्याच्या तर्‍हांना माफीच द्यावी लागते.
एखाद्या कल्पनेला ती चुकीची आहे असे ठामपणे म्हणणे हे कोणाला सृजनतेच्या दृष्टीने अमानुषतेचे वाटू शकते व ह्या निकषावर स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे खूप जणांना न पटणारे व अतिउद्धटपणाचे वाटणे साहजिक आहे. पण हे केवळ कल्पनेच्या स्तरावर तो करीत असे, वैयक्तिक स्तरावर तो अपार सहानुभूतीचाच रक्षक राहत आलेला आहे असे दाखविणारा एक किस्सा अपार महत्वाचा आहे. त्याच्या टीकेने घायाळ झालेल्या संशोधकांनी त्यांच्यातले सर्वोत्तम जसे दिले तसेच त्यामुळे त्यांना अगणित वेदना होत असत हे तर एव्हाना सर्वपरिचितच झालेले आहे. त्याचा एक संशोधक सहकारी तर शेवटी वेडा होतो. रस्त्याने नागडा हिंडू लागतो. तो स्टीव्ह जॉब्सच्या घरी येऊन दगडे मारू लागतो. एकदा तो बरेच दिवस परागंदा होतो. बर्‍याच दिवसांनी सहकार्‍यांना खबर लागते की तो पोलीस-स्टेशनात बंदिस्त आहे. मग स्टीव्ह जॉब्सवर त्याचे सहकारी त्याला सोडवण्याचे दडपण आणतात. मग स्टीव्ह जॉब्स ओळखी वापरत त्याला सोडवितो. ह्यावर तो त्यांना म्हणतो की कदाचित पुढे मागे मी जर असाच वेडा झालो तर तुम्ही मलाही अशीच मदत कराल ना ? सह-संवेदनांचे माणूसपण इथे स्टीव्ह जॉब्सच्या ह्या कृतीत व उक्तीत जे दिसते ते त्याच्या उद्धटपणाइतकेच मोहकही वाटू लागते.
धुमच्छक्रीचे जीवन जगत असताना स्टीव्ह जॉब्स एखाद्या तत्ववेत्त्यालाही लाजवेल अशा तत्वज्ञानाचे आपल्याला दर्शन देतो, हे ह्या पुस्तकात आयझॅकसनसारखा लेखक अपार कौशल्याने रेखतो. संगणकीय उत्पादनात स्टीव्ह जॉब्सला ऑन-ऑफ स्विचेस आवडत नसत, हे सांगताना त्यामागचे तत्वज्ञान लेखक आपल्याला समजून सांगतो. त्याअगोदर हे ऑन-ऑफ स्विच प्रकरण थोडे उदाहरणाने समजून घेण्यासारखे आहे. जसे गाडीचा दरवाजा उघडला की आतले लाईट लागतात व दरवाजा बंद केला की ते मिटतात, हे साधे उदाहरण घ्या. आतल्या लाईटला ऑन-ऑफ करणारे स्विच असतेच पण ते न वापरता आपण ही सोय अवलंबितो व ते किती सोयीचे होते, ते आता आठवा. स्टीव्ह जॉब्सच्या विचारांनुसार प्रत्येक माणूस जीवनात जे प्रयत्नांती कमावतो, त्याचे हे संचित, ते त्याच्या स्विच-ऑफ होण्याने, मृत्यूने, नुसतेच मिटले जाणे हे न्यायाचे नाही. इथे आपल्याला वाटते स्टीव्ह जॉब्स त्याच्या बौद्ध जाणीवांनी पुन:र्जन्माबद्दल तर बोलत नाही ना ? तर तो एखाद्या व्यवस्थापनशास्त्राच्या थाटात सांगतो की कंपनीच्या कर्त्याधर्त्याच्या मृत्यूनंतर, नवनवीन कल्पक उत्पादने येतच राहिली पाहिजेत अशी, ऑन-ऑफ स्विच विनाची व्यवस्था असली पाहिजे. मग तो ऍपल कंपनी एकापाठोपाठ नवनवीन कल्पक उत्पादने कशी करू शकतात, त्यामागच्या व्यवस्थेची आपल्याला उकल करून देतो. ह्यात कल्पक विचारांना सहानुभूती हवी, हे गृहितक तर आहेच पण त्याचबरोबर चुकीच्या कल्पनेवर, रोखठोकपणे कठोर प्रहार हवा हे तत्वही तो सांगतो. असल्या व्यवस्थेचे आदर्श असलेली डिस्ने ही कंपनी जे सिनेमा क्षेत्रात करू शकली नाही ते स्टीव्ह जॉब्स पिक्सार ह्या त्याच्या कंपनीमार्फत टॉय-स्टोरी, फाईंडिंग नेमो, ए बग्ज लाईफ, टॉय-स्टोरी-२, असे एकापेक्षा एक व्यावसायिक यशाचे व मनोरंजनात अत्युच्च कोटीचे असलेले सिनेमे तयार करतो. असेच त्याच्या मृत्यूनंतर नुकतेच बाजारात आलेले आयफोन ४-एस हे उत्पादन ह्याच निकषावर दाखवून देते की कल्पकतेला मरण नसलेलीच ही ऍपल कंपनी आहे.
जनरीतीप्रमाणे ह्या पुस्तकाच्या उलटही अनेक मते आली आहेत. पण ती स्टीव्ह जॉब्सच्या विचित्र वागण्याने दुखावलेल्यांची असण्याची शक्यता ज्यास्त आहे. किंवा त्याचे तत्वज्ञान मंजूर नसलेल्यांची . एका कसलेल्या लेखकाला स्टीव्ह जॉब्सचे जीवन इतके समृद्ध भासावे व त्यातले रोमांचक क्षण व त्यामागचे दुवे नीट आपल्यासाठी उलगडून दाखवावेत, त्याच्या विचित्रतेच्या मागची तत्वे सांगावीत, हे क्वचितच आढळणारे निरपेक्ष निवेदन मोठे मनोहारी आहे, हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. अवश्य वाचा व एका अवलियाला ई-मान द्या !.

-----------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

---------------------------------------------------------------------------------------------